शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांचे दिल्ली दौरे वाढले आहेत. आज सायंकाळी सात वाजता ते पुन्हा एकदा दिल्लीकडे रवाना होणार होते. आणि रात्री ९ वाजता ते महाराष्ट्र सदन येथे पोहोचणार होते. मात्र त्यांचे दिल्लीसाठी विमानाने उड्डाण होण्या अगोदरच त्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत असून दिल्ली दौरा रद्द होण्यामागे कारण मात्र अस्पष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा हा पाचवा दिल्ली दौरा असून ते भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मुख्य म्हणजे यावेळी दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार होते. त्यामुळे हा दिल्ली दौरा नेमका कोणत्या कारणांसाठी आहे? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात होते.
या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्याविषयी वकिलांच्या गाठीभेटी घेण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा हा पाचवा दिल्ली दौरा आहे. पहिल्या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर खासदारांची भेट घेतली होती. तिसऱ्या दौऱ्यात त्यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समारोपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तर चौथ्या दौऱ्यात ते नवीन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिले होते.
दरम्यान, यासंदर्भात बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच तेथे मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने भाजपाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसे पाह्यला गेले तर मंत्रिमंडळातील संभावित मंत्र्यांच्या नावावर एकमत झाले आहे. मात्र त्यावर अंतिम मोहोर उठविण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला चालले आहेत. या मंत्रिमंडळात किमान १८ मंत्री असतील अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली.