मराठी ई-बातम्या टीम
मला माहित आहे शिवसेनेची ही पत्रकार परिषद अनेकजण पहात असतील. विशेषत: ईडीवाल्यांनो ऐका आणि जमले तर माझ्या घरी या आता मी ज्याचे नाव घेणार आहे त्यामुळे ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयाचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिंतेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे? याचे उत्तर द्या जो मुंबईतल्या बिल्डरांकडून ईडीच्या नावाने वसुली करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी करत मुंबईतल्या ६० बिल्डरांकडून ३०० कोटी रूपयांची वसुली करण्यात आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला.
या वसुलीची आपल्याकडे माहिती आली असून हे वसुल केलेले सर्व पैसे मनी लॉंडरिंगच्या माध्यमातून कोणाकडे आणि कसे पाठविले याची माहिती आपण सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पीएमसी बँकेत तर मी खातेदारही नव्हतो. परंतु त्या बँकेत माझे मित्र आहेत. त्यांच्यावर ज्या काही धाडी आणि अटक करण्यात आली. ते सगळे माझे मित्र आहेत. केवळ ते माझे मित्र आहेत म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत या घोटाळ्यातील खरा आरोपी हा राकेश वाधवान हाच आहे. ज्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मित्रांवर धाडी टाकण्यात आल्या. त्यादिवशी रात्री मी स्वत: अमित शाह यांना फोन केला आणि त्यांना सांगितले, तुम्ही मोठे नेते आहात. मला तुमचा आदर आहे. पण केवळ माझे मित्र आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर धाडी का टाकता, असा सवाल करत जर माझ्याशी शत्रुत्व असेल तर तुम्ही माझ्यावर धाडी टाका, मला टॉर्चर करा पण मित्रांना का म्हणून लक्ष्य करता असे त्यांना सांगितले.
त्यामुळे मी पळपुटा नाही त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतो असे सांगत आमचा डिएनए तुम्ही अजून बघितला नाही. लहान लहान मुलांना धमकावयाचे काम ईडीकडून सुरु आहे. मी ज्याच्याकडून काही वर्षापूर्वी जमिन घेतली त्या व्यक्तीचे वय ८० वर्षे असून त्या वृध्दाला त्यावेळी झालेल्या व्यवहाराची माहिती दे म्हणून धमकाविण्याचे काम सुरु आहे. माझ्या मुलीच्या लग्नातील नेल पॉलिशर, फुलवाला आदी लोकांपर्यत ईडीवाले पोहोचल्याचे मला समजले असून काल परवा ईडीवाल्यांनी माझ्या सारस्वत आणि एसबीआय बँकेतील मागील २० वर्षातील व्यवहाराची माहिती घेवून गेल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही आम्हाला कितीही झुकविण्याचा प्रयत्न करा पण हम झुकेंने नही असे सांगत २०२४ नंतर आम्हीही बघणार आहोत असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी भाजपाला दिला. आजचा हा फक्त ट्रेलर असून आगामी काळात ऑडिओ, व्हिडिओ घेवून मी येणार असल्याचे सांगत त्यांनी आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर काढणार असल्याचे निक्षूण सांगितले.
केजीबी, आर्यन, कालभैरव यासह मोहित कंबोजच्या अनेक कंपन्यात गुंतवणूक कशी आली असा सवाल करत हा सगळा पैसा कुठून आला याची माहिती फक्त फडणवीसांनाच माहित असेल असे सांगत उद्यापासून तुम्हाला याबाबतची माहिती कळायला लागेल असे प्रसार माध्यमांना सांगितले.
खरेतर ही पत्रकार परिषद मी ईडीच्या कार्यालयासमोरच घेणार होतो. परंतु आमच्या चर्चेनंतर असे ठरले की या पत्रकार परिषदेची सुरुवात शिवसेना भवनातून करायची आणि शेवट ईडी कार्यालयासमोर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी सांगितले, धाडसत्र का सुरु झाले?
साधारणत: २० दिवसांपूर्वी किंवा त्या आधी भाजपाचे काहीजण मला दिल्लीत भेटायला आले. त्यांनी मला सांगितले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पण तुम्ही आडवे येवू नका. आम्हाला काही आमदारही मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही आडवे येण्याऐवजी आम्हाला मदत करा तुम्हाला काहीही होणार नाही.
पण त्यांना सांगितले, महाविकास आघाडी सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. आणि राज्यात ठाकरे सरकार असून त्या सरकारला जराही धक्का लागेल असे कोणतेही कृत्य मी करणार नसल्याचे त्यांना निक्षुण सांगितले. त्यावर मग त्यांनी मला तुम्हाला आम्ही त्रास देवू, तुमच्या मागे केंद्रीय यंत्रणा लावू अशी धमकी दिली. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या घरी आयकर विभागाने धाडी मारल्याचे त्यांनी सांगत माझ्याशी संबधित लोकांच्या घरावरही हे धाडसत्र सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.