मुंबई : प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातले शिवसैनिक आक्रमक होते. मात्र त्यांना आता शिवसेनेच्या नेत्यांनी शांत केल्याचे सांगत शिवसेना आक्रमक आहे, पण गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र देत केवळ गुन्हेगारीमुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस हा गुंडाचा पक्ष असल्याची अप्रत्यक्ष आरोप गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केला.
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणाचा तपास प्रगती पथावर असून जिल्ह्यातली गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे सांगत याप्रकरणी कोण कितीही मोठा असला तरी कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी निवडणूकीतील राजकारणाचा राग धरून शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या घालून तसेच गुप्ती ने वार करून हत्या करण्यात आली. त्यांनतर याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी अटक केली होती. तर त्यांचे वडील आमदार अरूण जगताप यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला असून ते फरारी आहेत. तसेच हत्येप्रकरणी भाजपचे आमदार आणि संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजीराव कर्डीले यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी कारवाई सुरु केल्यांनतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता .त्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांना अटक केल्याचे केसरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात काही गुंडांना मदत केल्याप्रकरणी काही पोलिसांवरही कारवाई सुरु असल्याचे सांगत सरकारी कामात अडथळा आणून पोलीस कार्यालयाची तोडून आपण सुटू शकतो असा समज कुणीही करू नये असा सज्जड दमही त्यांनी कर्डीले आणि जगताप यांना दिला.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असून अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करून सर्व गुन्हेगारांची पाळंमुळं शोधून काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.