कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल यांनीही टीका केली. या कार्यक्रमात बोलताना प्रफुल पटेल यांनी २००४ सालापासून शरद पवार हे भाजपासोबत जाणार होते. मात्र शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे आम्ही जाऊ शकलो नाही असे सांगत मी ही पुस्तक लिहिणार असून त्यात अशा अनेक गोष्टींची माहिती देणार असल्याचे जाहिर केले.
याबाबत शरद पवार यांना विचारले असता म्हणाले, मलाही उत्सुकता आहे की, ते जे पुस्तक लिहिणार आहेत. त्या पुस्तकात कोणती माहिती देणार आहेत. तसेच ते फक्त दिल्लीतील घटनांची माहिती देणारे पुस्तक लिहिणार की मुंबईतल्या घटनांची माहिती लिहिणार असा खोचक सवाल उपस्थित केला.
तसेच पुढे बोलताना शरद पवार यांनी प्रफुल पटेल यांना आठवण करून देताना म्हणाले, की, मुंबईत प्रफुल पटेल यांचे घर आहे. त्यांच्या घरी ईडीचे काही अधिकारी गेल्याचे ऐकिवात आहे. तसेच प्रफुल पटेल यांच्या घराचे किती मजले ईडीने ताब्यात घेतले होते याचेही एक प्रकरण पुस्तकात द्यावे असा उपरोधिक सल्लाही प्रफुल पटेल यांना दिला.