आज क्रिकेट विश्वचषक कपची अंतिम लढत भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघा दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्याकडे देशभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागलेले असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या क्रिकेट सामन्यावरून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले, क्रिकेट खेळ हा आता खेळ कुठे राहिला आहे. आता तो बेटींग आणि फिक्सिंगचा खेळ झाला आहे. त्यामुळे त्यांचा आत्ताच धुव्वा उडवला असता. पण बेटींग आणि मॅच फिक्सिंगच्या आधारावर सध्या देश चालवला जात असल्याची टीका भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, क्रिकेटची खरी पंढरी ही मुंबई. पण त्यांनी तो खेळ गुजरातला नेला. प्रत्येक गोष्टीचा हे लोक राजकिय इव्हेंट करतात. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करतात. इथे कोणाचा मृत्यू असो, डोळ्यातून अश्रु काढणं असो. ही तर आता विश्वचषक स्पर्धा आहे. इथं राजकारण कशासाठी पण भाजपावाले त्याचंही राजकिय इव्हेंट सुरु आहे असा टोलाही लगावला.
भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, संध्याकाळी भाजपावाले सांगतील, मोदी होते म्हणून अशी बँटींग झाली, मोदी होते म्हणून संघाने अशी गोलंदाजी केली, मोदींच्या सांगण्यामुळेच असा खेळ झाला आणि असं चित्र उभं करतील की, मोदी बॉलिंग करत होते आणि अमित शाह बॅटींग करत होते. भाजपाचे लोक मैदानाच्या सीमेवर उभे राहतील आणि आम्ही सांगितलं होतं की, मोदींनी सांगितलं म्हणून भारतीय संघाला विजय मिळाला. या देशात आजकाल काहीही होतं असा उपरोधिक टोलाही लगावला.