देशात आधीच लव्ह जिहादवरून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी संघटनांकडून होत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात या अनुषंगाने स्वतंत्र कायदाही आणण्यात आला. त्या पाठोपाठ राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारच्या समर्थक विशेषत: भाजपाच्या आमदारांकडून महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा कांगावा करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्यातच पालघरच्या श्रध्दा वालकरची हत्या तिचा प्रियकर आफताब पुनावालाने केली. त्यामुळे अनेक ठिकाणी हिंदूत्ववागी संघटनांकडून मोर्चेही काढण्यात येत आहे. असाच एक मोर्चा नाशिकमध्ये झाला, त्यानंतर शनिवारी ३ डिसेंबर त्र्यंबकेश्वरमध्येही हा मोर्चा काढण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांना लव्ह जिहादप्रश्नी प्रसारमाध्यमासमोर भूमिका मांडली.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळं काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.
मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचं रक्षण झालं पाहिजे, अशी भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
भाजपा प्रवक्ते आणि राज्यपालांना शिव्या देऊन दाखवाव्यात
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना उत्तम शिव्या येत असतील, तर त्यांनी आधी या शिव्या राज्यपालांना, भाजपा मंत्री आणि प्रवक्त्यांना देऊन दाखवाव्यात असे आव्हानही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना दिले.
गद्दारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात. वादग्रस्त भाजपा प्रवक्त्यांना शिव्या देणाऱ्यांवर आम्ही फुलं उधळू. महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल. महाराष्ट्रात ढोंग्यांची लाट आली आहे. कुठलं यांचं शिवप्रेम. मोदींना रावण म्हटल्यावर त्यांची अस्मिता जागी होते, पण शिवाजी महाराजांबद्दल बोलल्यावर अस्मिता जागी होत नाही. तेव्हा ते त्यांचा नाग फणा काढत नाहीत, असा खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.