आम्ही स्वतंत्र लढलो, तर किमान ६ लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नागपूर येथे रवी भवनला झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४२ मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या आहेत, त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील सभेला येणारा माणूस स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण या बजेटमध्ये पाहिलं, तर सामाजिक सुधारणेचे कार्यक्रम जे आहेत किंवा सामाजिक कल्याणच्या योजना आहेत त्या कमी करण्यात आलेल्या आहेत. यामुळे दारिद्र्य रेषेखाली जगणाऱ्या माणसाचे आयुष्य हालाकीचे झाले असल्याचेही निदर्शनास आणून दिले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे सरकार आरएसएसचे आहे, हे भौगोलिक सीमा मानत नाहीत, राष्ट्रीय सीमा मानत नाहीत, तर ते सांस्कृतिक सीमांची चर्चा करतात. तेव्हा, या सांस्कृतिक सीमा विस्तारीत करण्यासाठी भारताला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव चाललाय का ? हे इथल्या विचारवंतांनी तपासलं पाहिजे आणि निवडणूकीपूर्वी लोकांसमोर मांडण्याची आवश्यकता असल्याचेही मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही ४८ च्या ४८ जागांवर ताकदीने लढू शकतो. ४८ पैकी २ जागा जर सोडल्या, तर प्रत्येक मतदारसंघात २.५० लाखांच्यावर आमची ताकद असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.