राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनेही आता मराठवाडा, विदर्भात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका आणि सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच आज वर्धा येथील वंचितच्या जाहिर सभेसाठी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी संध्याकाळी सभेत पक्षाची भूमिका मांडण्याआधी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि आरएसएसला थेट सवाल करत या देशात बहुसंख्य हिंदू असतील तर देशात धार्मिक राजकारण कशासाठी असा सवाल केला.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, मागील १० वर्षापासून त्याचा खुलासा होत नाही. गत दहा वर्षात ज्या कारवाया झाल्या त्यातून इतिहासातील हे भांडण असल्याचे दिसते. संतांनी जी मांडणी केली ती व्यक्ती व सामूहिक स्वातंत्र्याची आहे. वैदिक धर्मातील जी सामाजिक मांडणी आहे ती व्यक्तिस्वातंत्र्य तसेच सहजीवन नाकारणारी आहे. यातून संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे. त्याविरोधात भाजपा व आरएसएस या ठिकाणी दिसते असा थेट आरोप भाजपा आणि आरएसएसवर केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, उद्याचे संविधान कसे असेल याची ते चर्चा करीत नाही. पण जे सूचक वक्तव्ये येतात त्यातून हिटलरशाहीस पुरुस्कृत करणारी घटना असेल. आम्ही सांगू तसे करा. आम्ही सांगतो तसेच करा. तोच उद्याच्या नवीन घटनेचा पाया असेल. ही रचना येतांना आपल्याला विरोध होवू नये म्हणून अत्यंत सावध, पद्धतशीरपणे, जाणीवपूर्वक हिटलरशाहिस मानणार नाही असे देशाबाहेर कसे अशी परिस्थिती निर्माण केल्या गेली, याची उदाहरणे जाणीवपूर्वक देण्यात येत आहेत अशी टीकाही केली.
प्रकाश आंबेडकर यांनी देशातून सोडून गेलेल्या लोकसंख्येची आकडवारी देताना म्हणाले की, १९५० ते २०१३ पर्यंत ७ हजार २०० कुटुंबे देश सोडून गेली होती. पण २०१४ ते २०२४ म्हणजे आतापर्यंत देश सोडून जाणाऱ्या कुटुंबाची, तेही हिंदू कुटुंबाची संख्या २४ लाख झाली आहे. ज्यांची किमान मालमत्ता ५० कोटीची आहे अश्या या २४ लाख कुटुंबाना देश सोडायला लावलं. त्यांना मजबूर करण्यात आलं. हा देश सोडून जाणारा वर्ग संत परंपरेला मानणारा होता. परिस्थिती अशी निर्माण केल्या गेली की त्यांना देश सोडावा लागला. त्यांनीही त्यांच्या पुढील पिढीची चिंता म्हणून देश सोडला. डागाळलेले जीवन जगण्यापेक्षा देश सोडलेला बरं, असा विचार केल्याचेही सांगितले.