Breaking News

सरकार दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने राष्ट्रवादीकडे प्रश्न पाठवावे जनतेने प्रश्न आणि समस्या राष्ट्रवादी कार्यालयात पाठविण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी
दुष्काळ… महागाई… इंधनाचे वाढते दर… महिला सुरक्षितता… आरक्षण… शेतकऱ्यांचे… सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत त्यामुळे जनतेकडूनच थेट प्रश्न मागवण्यात येत असून हे प्रश्न आणि समस्या येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप सरकारच्या गळी उतरवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी देतानाच राज्यातील जनतेने आपले प्रश्न आणि समस्या पाठवण्याचे आवाहनही केले.
राज्यातील भाजप सरकार सत्तेत येवून चार वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत.विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवणार आहेतच शिवाय सरकारला जाब विचारण्याचे काम एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस विविध आंदोलनांच्या माध्यमातून करतो आहे. परंतु राज्याच्या जनतेलाही आपल्या भागातील…आपल्या गावातील आणि जिल्ह्यातील समस्या आणि अनेक प्रश्न सरकारदरबारी पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीने एक मंच देण्याचा प्रयत्न केला असून सर्वसामान्यांचे हे प्रश्न अधिवेशनाच्या माध्यमातून मांडण्याची भूमिका जाहीर केली आहे.
त्यामुळे सरकारला काही प्रश्न विचारायचे असल्यास किंवा स्थानिक समस्यांबाबत सरकारकडून प्रतिसाद अपेक्षित असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई पक्ष कार्यालयात जनता संपर्क साधू शकते वा आम्हाला [email protected] या ई-मेलवर प्रश्न मेल करू शकते असे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले आहे.
आम्ही राज्यातील जनतेकडून आलेले हे प्रश्न, त्यांच्या मागण्या,समस्या सरकारसमोर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न करणार आहे. हा आवाज फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही तर राज्यातील जनतेचा असणार आहे असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *