राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका
बुलढाणा- वरवटबकाल: प्रतिनिधी
हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतेय… तुमच्या नोकर्या घालवतंय… आधारभूत किंमत देत नाहीय… कापसाला दर नाही… तांदुळ, तूरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले. गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण मागणाऱ्या समाजांना अद्याप न्याय का देत नाही? असा जाब त्यांनी विचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यातील पहिली सभा बुलढाणा येथील वरवटबकाल येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ यांचे नाव समृध्दी महामार्गाला द्या आणि नाही दिले तर ही जनता तुम्हाला घालवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत या सरकारने राजमाता जिजाऊ यांचे नाव नाही दिले तर आमची सत्ता आल्यावर राजमाता जिजाऊ यांचे नाव देवू अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
सर्व पक्षांना बरोबर घेणार आहे. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनाही बरोबर घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मतांची विभागणी होवू नये यासाठी हा प्रयत्न करत असल्याचे सांगत आघाडीला गालबोट लागेल असं वक्तव्य करु नका. मोडता लगेच येते. परंतु जोडताना दमछाक होते. त्यामुळे याचा विचार करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
‘पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो’ हा रोग मोदींसह फडणवीसांना लागलाय – जयंत पाटील
मोदींनी पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे जाहीर केले तोच रोग राज्यात फडणवीसांना लागला त्यांनीही पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केले परंतु यांची वेळ संपत आली तरी पहिली कॅबिनेट झालेली नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील केली.
जे बोलेल ते करेल असे सरकार आपल्या येत्या काळात आणावयाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दैदीप्यमान यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
समृध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या -धनंजय मुंडे
समृध्दी महामार्ग जिजाऊ च्या पवित्र भूमीतून जात असल्याने या महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
पंतप्रधान चौकीदार असतानाही देशातील चोर करोडो रुपये लूट करुन गेले आहेत. त्यामुळे मोदी कृपेने तुमच्या- माझ्या डोक्यावर १५ लाखाचे कर्ज केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत सरकारी कोषात तत्वत:, सरसकट हे शब्द सापडले नाहीत. परंतु हे संघाच्या पोतडीतून आले आहेत. ५२६ रुपयाचा फोन हेडफोन आणि चार्जेरसहीत १६३६ रुपयात घेणं म्हणजे राफेल आहे अशा शब्दात राफेलचा अर्थही त्यांनी यावेळी सांगितला.