Breaking News

नाना पटोले यांची आरोप, … स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर जोरदार घोषणाबाजी करून शेतकरी विरोधी तिघाडी सरकारचा निषेध केला.

त्यांनतर विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा सरकार गंभीर असते तर विरोधी पक्षाच्या स्थगन प्रस्तावावार सभागृहात चर्चा केली असती पण हे सरकारच शेतकरी विरोधी असल्याने त्यांनी चर्चा करणे टाळले. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत. विदर्भातील प्रश्नावर चर्चा करु म्हणणारे भाजपाचे सरकारच विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चाच करत नाही. हे सरकार १४ कोटी जनतेशी खोटे बोलत आहे. शेतकऱ्यांना मदत करायची आहे की नाही ते सरकारने स्पष्ट केले पाहिजे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधीही कमी आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत पर्यटनासाठी हे लोक आहेत. जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला.

धानाला एक हजार रुपये बोनस द्या

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, विदर्भातील शेतकरीही अनेक समस्यांना तोंड देत आहे. अजून खरेदी केंद्रे सुरु झाली नाहीत. शेतकऱ्याचे धान व्यापारी ४००-५०० रुपये कमी दराने खरेदी करत आहेत. भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या धानाला भावच मिळू देत नाही. धानाला अजून बोनसही जाहीर केलेला नाही. सरकारने धानाला एक हजार रुपये बोनस दिला पाहिजे अशी मागणीही केली.

विरोधकांना घाबरवण्यासाठी SIT चौकशी..
पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक अधिवेशनाच्या काळात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंच्या चौकशीचा प्रश्न आणला जातो. आताही त्यांची एसआयटी चौकशी करु असा मुद्दा पुढे आणला आहे. सरकारला प्रश्न विचारू म्हणून अशा पद्धतीने सरकार विरोधी पक्षांच्या आमदारांना घाबरवण्याचे काम करत आहे, पण विरोधी पक्ष सरकारच्या अशा धमक्यांना घाबरत नाही, सरकारला जाब विचारण्याचे काम सुरुच राहिल. हा सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना धमकावण्याचा प्रकार आहे पण विरोधकांना घाबरवण्याचे सोडा व जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्या अशी मागणीही केली.

सरकारविरोधात विरोधी पक्षांची जोरदार घोषणाबाजी..

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांनी गळ्यात संत्र्यांचे हार घालून तिघाडी सरकारचा निषेध केला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *