Breaking News

नाना पटोले यांचा सवाल, महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले का ? लोकांना जीवे मारण्याचे हिंदुत्व भाजपा व फडणवीसांना मान्य आहे का?

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे परंतु भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेला दिले आहे का ? असा संतप्त सवाल करत भिडेवर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेला पाठीशी घालत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजी भिडेचा उल्लेख गुरुजी असा करतात, भिडेला पोलिसांचे मोठे संरक्षण दिलेले आहे, सत्ताधारी भाजपाला हा भिडे एवढा मोठा माणूस वाटतो का? संभाजी भिडेचे सहकारी ज्यांना धारकरी म्हणतात ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री आ यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देतात. लोकांना जीवे मारण्याचे हे कसले हिंदुत्व, हे हिंदुत्व फडणवीस यांना मान्य आहे का? भाजपाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत असा आरोपही केला.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा आहे, या राज्यात भाजपा संभाजी भिडे सारख्या व्यक्तींना पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे याचा पुनरुच्चार पटोले यांनी केला. भाजपा पेटवण्याचा प्रयत्न करत असला तरी राज्यातील जनता मात्र अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असा आरोपही केला.

भाजपा सरकार व प्रशासनाच्या उधळपट्टीमुळेच ‘बेस्ट’ कामगार रस्त्यावर

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, जी-२० परिषदेच्या नावाखाली मुंबई शहरात मोठी सजावट करण्यात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे-मोठे फोटो लावण्यात आले. नाल्याचे पाणी दिसू नये म्हणून मोठे पडदे लावण्यात आले तसेच रस्त्यावर जागोजागी दिव्यांची आरास करण्यात आली. या सजावटीवर कोट्यवधी रुपयांची उधळले गेले. सुशोभीकरणाच्या नावाखाली ३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. शासन व प्रशासनाला जनतेचा पैसा जी-२० वर उधळण्यास आहे पण कर्मचाऱ्यांना देण्यास नाही म्हणूनच बेस्ट कर्मचाऱ्यांना आज रस्त्यांवर येण्याची वेळ आली आहे.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *