आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे जाणार असल्याची घोषणा केली.
इंडिया आघाडीतील सहभागी राजकिय पक्षांसोबत काँग्रेसकडून चर्चेच्या फेऱ्या सातत्याने होत आहेत. त्या अनुषंगाने तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील जागा वाटपाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाला प्रस्ताव पाठविला. परंतु काँग्रेसने तृणमूल काँग्रेसने पाठविलेला जागा वाटपाचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे अखेर तृणमूल काँग्रेस लोकसभा निवडणूकीसह राज्यातील कोणत्याही निवडणूका एकट्याने लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बँनर्जी यांनी सांगितले.
काँग्रेसबरोबरील चर्चा फिसकटल्यानंतर काँग्रेसबरोबर असलेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना ममता बँनर्जी म्हणाल्या की, इंडिया आघाडीचे आम्ही सदस्य आहोत. तरीही भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमधून जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी कळविली नाही. किमान एक शिष्टाचार म्हणून आम्हीही भारत जोडो न्याय यात्रेचे स्वागत करण्यासाठी गेलो अशी खंत व्यक्त काँग्रेसकडून याबाबत आम्हाला कळवायला हवे होते अशी नाराजीही बोलून दाखविली.
तसेच ममत बँनर्जी पुढे बोलताना म्हणाल्या की, आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्षतावादी पक्ष आहे. त्यामुळे पुढील वाटचालीसंदर्भात आम्ही योग्य वेळी निर्णय घेणार असून तो निर्णय लोकसभा निवडणूकीनंतर घेणार असल्याचे सांगत आम्ही सर्व धर्मनिरपेक्षतावादी पक्ष भाजपाच्या पराभवासाठी काहीही करू शकतो असे सांगत निवडणूकीनंतर पुढील निर्णय घेणार असल्याचेही पुन्हा एकदा स्पष्ट केले.