राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र जयंत पाटील यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत या बातम्यांची हवाच काढली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही. त्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी अनेक महिने दिल्लीला कधीच गेलोच नाही, त्यामुळे माझी कोणाशी भेट होणे अशक्य आहे. मी १७-१८ वर्ष मंत्रीपदावर राहिलो आहे. त्यामुळे मला त्याबाबत प्रलोभने देऊ शकत नाही अशी रोखठोक भूमिका मांडत असतानाच त्यांनी प्रसार माध्यमांविषयी माझ्या मनात राग नाही. माध्यमांमुळेच आम्हाला प्रसिद्ध मिळत आहे असे म्हणत माध्यमांचे आभार मांडले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने हातकणंगले किंवा सांगली मतदारसंघात आमचा उमेदवार उभा राहू शकतो का याची चाचपणी नक्कीच आम्ही करत आहोत. प्रतीक पाटील यांना तिथे चांगला प्रतिसाद आहे. राजू शेट्टी यांनी आमच्याशी काही चर्चा केलेली नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हातकणंगले मतदारसंघाबाबत चर्चा केल्याचे यावेळी सांगितले.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षामध्ये चांगले समन्वय आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनाही आम्ही विश्वासात घेत आहोत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे अशीही माहिती दिली.
नितेश राणे यांच्या भाषणावर बोलताना जयंत पाटील म्हणाले…
सार्वजनिक जिवनात कोणती भाषा वापरायची यावर विचार व्हायला हवा. विरोधकांवर बोलताना संयमाने बोलण्याची आजपर्यंतची परंपरा आहे. पण ही परंपरा मोडीत काढली जात आहे. भाजपाला ही भाषा मान्य आहे का? याचा खुलासा त्यांनी केला तर महाराष्ट्रातील जनतेला नेमकी भूमिका कळेल.