पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करत जयंत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूर दौऱ्यावर असून येथे माध्यमांशी बोलताना वरील प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार यांच्या गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहे, ते कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहित नाही. परंतु माझ्या संपर्कात नाहीत. मोदींच्या संकल्पाला साथ देण्यासाठी आमच्यासोबत येणाऱ्यांसाठी दुपट्टा तयार असून पक्षात भरपूर स्पेस आहे, कुणालाही नाही म्हणणार नाही. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतचही असेच आहे, असेही स्पष्ट केले.
काँग्रेसमधील काही माजी खासदार, आमदारांनी भाजपात प्रवेश करताच त्यांना लगेच पद दिले जाते. परंतु भाजपाच्या निष्ठावंताना अर्थात माधव भंडारी सारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र प्रत्येकवेळी डावलले जात असल्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता व्यथित होत नाही
कुणीही आमच्या पक्षात आले तरी कार्यकर्ता व्यथित होत नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही असे सांगत माधव भंडारी यांच्या मुलाकडून समाजमाध्यमांवर जारी केलेल्या पोस्टवर अधिक बोलणे टाळले.
टिकणारे आरक्षण मिळेल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत शपथ घेतली होती. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महाराष्ट्र सरकार देईल, असा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जागावाटप अद्याप निश्चित झाले नाही, उमेदवारीची चर्चा नाही. महायुतीचे तीनही नेते बसतील आणि त्यानंतर जागा वाटप ठरेल असे सांगत राहुल गांधी जिकडे जातील तिकडे मोदींचा जयघोषच होणार असा टोलाही यावेळी लगावला.