आधीच महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू पोहचल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा ही सामग्री मिळाली नसल्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्यातच ‘आनंदाचा शिधा’वरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काही लोकांचं पिक वाचलं असेल, पण पाण्यामुळे ते कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाज केला. पाठ थोपटून घेत शिध्यावर स्वत:चे फोटो छापले अशी टीका केली.
लोकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला. १०० रुपयांत दिवाळी साजरी होते का? यामुळे शेतकरी दुखावला आहे. १०० रुपयांची दिवाळी भेट देऊन त्यांच्या दुखावर मीठ चोळलं आहे. त्यातही काही मंत्री स्वत: शिधा वाटप करत होते. पण, शिधा वाटप हे दिवाळी सण करणाऱ्यांची कुचेष्टाच आहे असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, राज्यातील अनेक भागात आनंदाचा शिधा मिळाला नसल्यावर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आनंदाच्या शिधामध्ये पाच वस्तू आहेत. त्यामुळे या पाचही वस्तू एकत्रितरित्या राज्यात पोहोचविणे हे तसे सोपे काम नाही. दिवाळी ही वास्तविक पाहता तुळशीच्या लग्नापर्यंत असते. त्यामुळे तुळशीच्या लग्नाच्या आधी पर्यंत आनंदाचा शिधा राज्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला.