२०२४ च्या लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे जायला आणखी कालावधी असताना निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून विशेष अधिवेशन नव्या संसद इमारतीत घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावत आज सुरुवात करण्यात आली. यावेळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधित करण्याची परवानगी दिली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशचतुर्थीचे महत्व विषद करताना गणेश देवता ही बुध्दीची देवता आहे. आर्थिक सुबत्तेची देवेता आहे. या गणेशचतुर्थीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी सर्वांना एकत्रित आणत स्वराज्याची चेतना जागविली असे सांगत नवा भारत कसा असेल याचे संकेत दिले. यावेळी मात्र देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मरण करण्याचे टाळले.
गणेशाचे नमन करताना जैन धर्मियांकडून पाळण्यात येणाऱ्या मिच्छामी दुःखड्म चा उल्लेख करत अप्रत्यक्षरित्या मोदी यांनी आपल्या विरोधकांची माफी मागितली.
जून्या संसदेचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या पहिल्या सुर्यकिरणाचा ती इमारत साक्षिदार आहे. तर ही इमारत स्वातंत्र्याची साक्षिदार आहे. तसेच लोकसभेत बसविण्यात आलेला सेंगोल ला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाताचा स्पर्श झालेला आहे. देशाच्या सत्ता हस्तांतरणावेळी तो नेहरू यांना देण्यात आला होता अशी आठवण सांगत त्यामुळेच हा सेंगोल इथे स्वातंत्र्याचा साक्षिदार म्हणून विधिपूर्वक स्थापित केला असून हा सेंगोल तामिळनाडूच्या अतिविराट सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचे आवर्जून सांगितले.
याशिवाय नव्या संसदेच्या इमारतीच्या सुरुवातीलाच या इमारतीच्या उभारणीसाठी राबलेल्या श्रमिकांच्या माहितीचे एक डिजीटल पुस्तक ठेवण्यात आले आहे. या पुस्तकात श्रमिकांची पूर्ण माहिती असून त्यांच्या श्रमालाही महत्व देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तसेच पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, याशिवाय देशाच्या उभारणीत आतापर्यंत काहीसे दुर्लक्षित राहीलेल्या श्रमांनाही महत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले आगामी काळात तिकडे बसलेल्या (विरोधकांच्या बाकाकडे बघत) आणि इकडे बसलेले (सत्ताधारी वर्ग) सदस्यांची कृती देश बघेल आणि तिकडच्यांना तिकडे बसवायचे की इकडच्यांना तिकडे बसवायचे याचा निर्णय करेल असे सांगत ही संसद पक्षांच्या हितासाठी नाही तर देशाच्या हितासाठी असल्याचा चिमटा काँग्रेसला काढला.
त्याचबरोबर महिला आरक्षणला आमची मंजूरी देत असल्याचे सांगत नारीशक्ती वंदन विधेयकाला आमचा पाठिंबा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत या कायद्याला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मंजूरी द्यावी असे आवाहन करत नारीशक्ती विधेयकाची कायदा म्हणून अंमलबजावणी करण्याचे आश्वासनही लोकसभेत यावेळी दिले.