माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही असा निर्धार भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भगवान भक्तीगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुडे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. हा चिखल फेकणाऱ्यांचा नाही, तर चिखल तुडवणाऱ्यांचा मेळावा आहे असंही त्यांनी सांगितलं.
चिखल तुडवणं, संघर्ष करणं हे आमच्या रक्तात आहे. जे गोपीनाथ मुंडेंचे विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कुणावर वैयक्तिक आरोप केले नाही, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही, असेही त्या म्हणाल्या.
गोपीनाथ मुंडेंना संघर्ष नव्हता का? त्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आला. प्रवाहाविरोधात जात ज्या पक्षात कोणीच जात नव्हतं, त्या पक्षात गोपीनाथ मुंडे कमळाचं फुल हातात घेऊन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत लढले. त्यांचा संघर्ष कमी झाला का? ४० वर्षांच्या राजकारणात केवळ साडेचार वर्षे सत्ता मिळाली. हा संघर्ष कमी आहे का? त्या गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आपल्यासमोर आहे,
२०२४ साली विधानसभेला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. मी कोणासमोर पदर पसरून काही मागणार नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडे सडेतोड भाषण केले
माझ्या नाराजीची चर्चा बंद करा, कोणीही नाराज नाही. कुणाचीही अवहेलना करू नका, कुणाचा अपमान करू नका. ही माझी इच्छा आहे. एवढे दिवस मी कधीच यावर बोलले नाही, मौन बाळगलं. कारण माझा तसा स्वभाव नाही. मला गर्व नाही, मला स्वाभिमान आहे. माझ्या लेखी हा विषय संपला आहे. ज्यांना मंत्री करायचं ते करतील, आपण २०२४ च्या तयारीला लागलं पाहिजे, असे सांगत त्यांनी निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे संकेत दिले.
व्यक्तीपेक्षा संघटन मोठं आहे, त्याच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. संघटन व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. राजा असेल किंवा रंक सर्वांना हा नियम लागू आहे. माध्यमांनी यापुढे कोणत्याही आमदारकीच्या यादीत माझं नावं चालवू नये. २०२४ ला पक्षाने तिकीट दिल तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बोटाला कधीही स्पर्श केला नाही, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी दसरा मेळाव्यासाठी हजर झालेल्या लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची व्यवस्था करण्याचीही आपली ऐपत नाही, असं विधानंही केले.
हकीकत को तलाश करना पडता हैं, अफवा तो घर बैठे बैठे मिल जाती हैं. इथं जमलेले लोक ही माझी ‘हकीकत’ आहे, माझी शक्ती आहे. माझ्याकडे तुम्हाला बसायला द्यायला खुर्च्या नव्हत्या, तुमची व्यवस्था करण्याची माझी ऐपत नाही. तुम्ही दाटीवाटीने इथं बसला आहात. खुर्च्या लावल्या असत्या तर हा मेळावा किती मोठा झाला असता. किमान चारपट तरी झाला असता. तुम्ही जमिनीवर बसणं गोड मानलं, मी तुमचे आभार मानते, असं पंकजा मुंडे भाषणातून म्हणाल्या.