काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. ते म्हणाले आम्हाला जमिन दाखवायची आहे. मी तर म्हणतो खरेच दाखवाच आम्हाला जमिन. आम्ही जमिनीवरचेच आहोत. या इथे बघा असे सांगत अमित शाह म्हणतात तसे काही ठरले नव्हते. मी माझ्या मात्या-पित्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते तसेच आहे. त्यावेळी अडीच वर्षे शिवसेनेचा आणि अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्री असेच ठरले होते असे निश्चियपूर्वक शपथपूर्वक शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या एकनिष्ठ मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उध्दव ठाकरे यांचे समर्थक आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते जातीने हजर होते. यावेळी शिवाजी पार्कचे मैदान पूर्वीप्रमाणेच गच्च भरल्याचे दिसून येत होते.
होय आम्हाला जमिन बघायची आहे ती पाकव्याप्त काश्मीरची जमिन तुम्ही पुन्हा एकदा भारतात आणून दाखवा, ती जमिन आम्हाला बघायची आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी अमित शाह यांना लगावला.
अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहे की, भाजपाचे गृहमंत्री आहेत काही कळायला मार्ग नाही. या राज्यात जा त्या राज्यात जा, तिथले सरकार पाडा, तिथला पक्ष फोडा असलेच काम ते करत असतात. त्यामुळे ते भाजपाचे गृहमंत्री आहे की काय असे वाटते अशी टीकाही त्यांनी केली.
होय मी महाविकास आघाडी जन्माला घातली कारण भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे महाविकास आघाडी जन्माला घातला. जर भाजपाने खंजीर खुपसला नसता तर आघाडी जन्माला आली नसती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद दिले. तसेच त्यासाठी ते कायम पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री असताना आमच्या चार पाच पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे, पण पत्रकार परिषदांमध्ये माझ्या समोरचा माईक त्यांनी कधी काढून घेतला नाही की माझ्या कानात कोणत्या प्रश्नाचे उत्तर सांगितले नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले शिवसेना पक्ष संपत चाललेला पक्ष आहे. दुसरे कोणतेही पक्ष राहणार नाहीत. मग काय एकच पक्ष राहणार आहे का?. या पध्दतीच्या राजकारणामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. या लोकशाहीला वाचविण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा देश पुन्हा एकदा हुकूमशाहीकडे नेला जात आहे. पुन्हा एकदा देशात गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोपही त्यांनी भाजपावर केला.
सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले सदगृस्थ आहेत. मी टोमणा नाही मारला जे चांगलं आहे ते मी सांगितलो. नाही तर ते म्हणतील मी टोमणा मारला म्हणून. सुरुवातीला ते आले. त्यावेळी म्हणाले मी पुन्हा येईन. हो आले ते पण दिड दिवसाच्या गणपतीसारखे आणि त्यांचे विसर्जनही झाले. त्यानंतर ते आले ते उपमुख्यमंत्री म्हणून आले अशी टीका करत उध्दव ठाकरे म्हणाले, फडणवीस म्हणाले कायद्यात राहुन बोला नाहीतर कायदा आपले काम करेल. अहो फडणवीस कायदा काय फक्त तुम्हालाच कळतो की काय आणि आम्हालाही कळतोच की असा उपरोधिक टोलाही फडणवीस यांना लगावला.
कायद्याच्याच भाषेत सांगायचे तर जर कोणी कारण नसताना जर आमच्यावर आला तर तुमच्या कायद्याची तमा आम्ही बाळगणार नाही. आमच्यावर चालून येणाऱ्यांना नेस्तनाभूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत कायदा फक्त आमच्यासाठीच लावा आणि तिकडे गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत गोळीबार करणाऱ्यांना आणि तगडं तोडीन म्हणणाऱ्यांना कायदा मात्र लावू नका असा खोचक टोलाही त्यांनी लागवला.
हिंदूत्व म्हणजे काय हो? तुम्ही फक्त गाईवर बोलताय पण मी म्हणतो महागाईवर बोला असे सांगत भाजपाला महागाईवर बोलण्याचे आव्हानच दिले. यांचे हिंदूत्व म्हणजे फक्त गाईवर बोलायचे लोकांच्या जीवनाशी निगडीत महागाईवरचे नाही. परवा पंतप्रधान मोदी हे जी राष्ट्रामध्ये संबोधित करायला गेले. तेथे त्यांनी सांगितले की भारत देश कसा प्रगती करतोय ते. त्यानंतर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी देशातील बेरोजगारी आणि महागाईवर बोलले. त्यांच्या या बोलण्याबद्दल मी त्यांचे अभिनंदनच करतो. मात्र त्यांच्या बोलण्यानंतर काही तरी फरक पडेल अशी आशाही त्यांनी केली.
यावेळी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख मींदे गट असाही केला.