मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या प्रमुख नेत्यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याचे लोण काँग्रेसमध्येही पसरले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचेही त्यांच्या समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने उध्दव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे म्हणून साकडं घातलं आहे. महाविकास आघाडी नेत्यांच्या या भावी मुख्यमंत्री पदाच्या बॅनरबाजीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खिल्ली उडवित म्हणाले काही जण मुख्यमंत्री पदासाठीही विठुरायाकडे जात आहेत.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण १० जण दावेदार आहेत. २०२४ पर्यंत यामध्ये आणखी दोन नेत्यांचा समावेश होईल, असा उपरोधिक टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, यासाठी ठाकरे गटाने पांडूरंगाकडे साकडं घातलं आहे, याबाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काही लोक मुख्यमंत्री होण्यासाठी विठूरायाकडे जात असतात. महाविकास आघाडीमध्ये दहाजण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे तीन नेते भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात. यामध्ये नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात. इकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही भावी मुख्यमंत्री म्हणून फोटो लावतात.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचे एकूण दहा दावेदार आहेत. २०२४ पर्यंत आणखी दोन नेत्यांचा या यादीत समावेश होईल. दहा मुख्यमंत्री असलेली ही पार्टी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्यासाठी कोण-कोण विठूरायाकडे गेलं होतं, हे मला माहीत नाही. पण आम्ही महाराष्ट्राला समृद्धी येऊ दे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारला एवढं बळ मिळू दे की, ते महाराष्ट्राला पहिल्या क्रमाकांवर आणतील, असंही म्हणाले.