मागील काही काळापासून अशोक पर्व आणि कफ परेडला लागून असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीवर आदर्श नामक इमारतीतील सदनिकांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपाच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला हात काँग्रेसच्या हातातून सोडवून घेत (राजीनामा देत) भाजपाचे कमळ नुसतेच हाती नाही धरले तर अंगावर धारण केले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावर नवी दिल्लीत राज्यसभेचा खासदार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा विधान परिषदेतील आमदार अमर राजूरकर यांनी यावेळी भाजपात प्रवेश.
भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या सदस्याचा अर्ज भरला. त्यावेळी उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्या भाजपा सदस्यत्वाच्या अर्जावर सही केली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांना अधिकृतरित्या भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाच्या उपरणे त्यांच्या गळ्यात घालत स्वागत केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांना सवाल करण्यात आला की राजीनामा देण्यामागे काँग्रेस पक्षातील कोणत्याही नेत्याच्या विरोधात भावना निर्माण झाल्याने आपण राजीनामा दिलेला नाही. पण राजीनामा दिल्यानंतर उपलब्ध पर्यायांचा विचार करून पुढे काय करणार याबाबतचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजपामध्ये येण्यासाठी कोणाचा दबाव होता का, की निवडणूकीच्या कालावधीत घडलेल्या अशोक पर्व या खटल्यात अटक होणार म्हणून भाजपात जाताय असा सवाल उपस्थित केला.
त्यावर अशोक चव्हाण म्हणाले की, न्यायालयात जी काही कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. त्याबाबत आम्ही आमचे म्हणणे न्यायालयात मांडले आहे. निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.
तसेच काँग्रेसमधील एखाद्या नेत्याच्या कार्यपध्दतीमुळे तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला का असा सवालही यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काहीजणांनी चांगले म्हटले तर काहीजणांनी चूकीचे असल्याचे म्हणून भूमिका घेतली. पण ५० वर्षे एकाच पक्षात असल्याने या गोष्टी होत असतात. तसेच माजी नाराजगी कोणाच्या विरोधात नाही की वैरभावना नाही. फक्त इतकेच आहे की काँग्रेसमध्ये आता पूर्वीप्रमाणे निर्णय प्रक्रिया होत नाही. तसेच निवडणूकीत विजय मिळविण्याच्या दृष्टीने राजकारण केले जात असल्याचे सध्या दिसून येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष कुठे चाललाय काही कळतच नाही सगळीच संभ्रमावस्था असल्याचे सांगितले.
भाजपाच्या व्यासपीठावर अशोक चव्हाणांकडून काँग्रेसचा उल्लेख
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या धर्तीवर व कथित तपास यंत्रणांच्या दबावामुळे अखेर भाजपामध्ये प्रवेशलेले काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमातच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा उल्लेख करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असा उल्लेख केला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा चंद्रशेखर बावनकुळे यांचाही उल्लेख केला. नंतर ही चूक लक्षात आल्यानंतर ५० वर्षे काँग्रेस पक्षात राहिल्याने एकदम बदल करता येत नाही. पण हळू हळू बदल होईल असे सांगितले.
काँग्रेसमध्ये असताना जसे प्रामाणिक पणे काम केले तसे भाजपातही करेन-
काल पर्यंत काँग्रेसमध्ये असताना ज्या प्रामाणिक पणे, निष्ठेने पक्षाचे काम केले. त्याच निष्ठेने आणि प्रामाणिक पणे भाजपा पक्षाचेही काम करेन अशी ग्वाही यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली.