तुम्ही माझ्या नातवाच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न केलेत, पण त्याही पेक्षा जास्त मी तुमच्याकरीता काही तरी केलेले आहे. माझ्याही हातून मोठ मोठी कामे झाली आहेत. ते ही लोकांना सांगा. अन्यथा येत्या दोन दिवसात मी प्रसार माध्यमांसमोर मी जे जे काही तुमच्यासाठी केले ते सगळे जाहीर करेन असा सज्जड इशारा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी येथे दिला. मातोश्रीच्या काही घटनांमध्ये मी ही मोठी कामे केलेली आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
गेली अनेक दिवस केवळ प्रसार माध्यमांसमोर बंडखोर आमदारांच्या शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून भूमिका मांडणाऱ्या आमदार दीपक केसरकरांनी गुरुवारी मुंबईतील एका हॉटलमध्ये प्रिंट मीडिया सोबत दिलखुलास संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मातोश्रीवरून वर्षा बंगल्यात आल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वागण्यात झालेला बदल त्यांनी यावेळी पत्रकारांसमोर अधोरेखित केले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्हा आमदारांना पक्ष प्रमुखांनी विचारात घेतले नव्हते. पक्ष प्रमुखांचा आदेश म्हणून आम्ही त्यांचे आदेश ऐकत होतो. काहीही बोलायची परवानगी नव्हती. मुक्याट्याने आम्ही सर्व सहन करीत होतो. वर्षा बंगल्यात प्रवेश नव्हता कोणाला. त्यांच्या हाताखालीची मंडळी सुद्धा आमदारांना भेट देऊ देत नव्हती असे सांगत त्यांनी सांगितले.
२०१९ मध्ये सेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेना मुख्यमंत्री म्हणून बनविण्याची कमिटमेन्ट दिली होती होती की नाही ? ती का पाळली नाही. असा सवालही करीत त्याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दयावे असेही केसरकर म्हणाले.
आम्हाला विश्वासघातकी म्हणता मग तुमच्या आजारपणात तुम्ही मुख्यमंत्री पदाचा कारभार एकनाथ शिंदे किंवा सुभाष देसाई यांना का दिला नाही. तेव्हा तुमचा विश्वास कोठे होता ? मग विश्वासघातकी कोण असा सवाल करून ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे संबंध बिघडले. ते महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगले नव्हते. अनेक कामे अडली होती. असे सांगत आरे कारशेड कामात उशीर झाल्यामुळे २ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांना एका प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी कोणी आमदारांनी आवाज काढला नाही असे विचारता या प्रकरणात संजय राऊत बोलत होते. कारण ते प्रवक्ते आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायच्या असतात. अशाप्रकारे मुलाखत घ्यायची नसते. असे सांगत केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
महाविकास आघाडी स्थापन करण्यात खासदार राऊत यांच्या सिहांचा वाटा आहे. मात्र त्याबद्दल त्यांना काहीही मिळाले नाही. त्याच्या योग्य सन्मान झाला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर नाराज आहेत असा चिमटाही त्यांनी राऊत यांना काढला.