काल दिवसभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजाविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी मागितली तर मग महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जयजयकार का करतात? असा सवाल करत शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी करत जोडे कसे मारायचे हे शिवसेना दाखवून देईल.
सकाळी संजय राऊत हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी टीकेची झोड उठविली.
संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात? भारतीय नौदलाला त्यांनी जे काय नवीन बोधचिन्ह दिलय, शिवाजी महाराजांच्या नौसेनेचं ते कशासाठी दिलं? औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटकं कशासाठी करता आहात? असा सवालही केला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानांचं तुणतुणं वाजवत. स्वाभिमान, स्वाभिमान म्हणत भाजपाबरोबर गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? राज्यपाल आणि भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर शिवाजी महाराजांचा अपमान करून ७२ तास झाले. तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांचे ४० लोक यावर साधा निषेधही करू शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरता आहात? शिवाजी महाराजांच्या या अपमानानंतर तुम्ही या सरकारमधून राजीनामा दिला पाहिजे होता, कारण भाजपाने शिवाजी महाराजांचा केलेला हा अपमान आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी या अपमानानंतर ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता अशी मागणीही केली.
वीर सावरकरांच्या अपमानानंतर तुमची लोक मुंबई आणि महाराष्ट्रात रस्त्यांवर उतरून राहुल गांधींना जोडे मारत आहेत, आता ते जोडे कुठे गेले? कोणाला जोडे मारणार तुम्ही? असा सवाल खोचक सवाल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
वीर सावरकर हे असे एकमेव महापुरुष होते, ज्यांनी त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली. शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते, गुरु होते आणि अशा शिवाजी महाराजांचा अपमान सुद्धा आपण सहन करता आहात, आपल्याला सावरकरांवर बोलण्याचा सुद्धा हक्क नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इथे बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही केली.
मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.