शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेवून भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. परंतु नव्याने राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि बहुमत चाचणी वेळी शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाने एकमेकांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करत व्हिपच्या विरोधात ठाकरे गटाने ४० जणांच्या विरोधात तर शिंदे गटाने १६ आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार विधिमंडळ सचिवांनी दोन्ही गटाच्या ५३ आमदारांना नोटीसा बजावित ७ दिवसांच्या आत उत्तर देण्याचे कळविले आहे. मात्र या नोटीसा बजाविताना आदित्य ठाकरे यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या या खास प्रेमाला प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्य सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला असून याविरोधात ‘आरे वाचवा’ आंदोलन केलं जात आहे. हे सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं नसल्याची टीका करत माझ्यावर खास प्रेम करण्याची गरज नाही, नाहीतर खंजीर खुपसण्याचं कारण नव्हतं. शिवसेना चिन्ह, लोकांवरील प्रेम उद्धव ठाकेंसोबतच राहणार आहे असे प्रत्युत्तर शिंदे गटाला दिले. महाविकास आघाडीचं सरकार मुंबई आणि महाराष्ट्राच्या हिताचा विचार कऱणारं होतं. आम्ही ८०८ एकर जंगल घोषित केलं होतं. हे करत असताना आदिवासींचे हक्क बाधित ठेवण्यात आले होते. कारशेड आपण कांजूरला नेण्याचा प्रयत्न करत होतो. कारशेड रोज लागत नाही. चार ते पाच महिन्यातून एकदा त्याचा वापर होतो असेही ते म्हणाले.
आधीचं प्लानिंग देखील चुकीचं होतं. कांजूरमार्गची जागा मेट्रो ६ ला द्या असं सरकार केंद्राला सांगत आहे. मेट्रो ६ सोबत अनेक मेट्रो लाईन कारशेडविना बांधायला घेतल्या होत्या. आरे जंगल असून हा फक्त झाडांचा प्रश्न नाही, तर इथे अनेक प्राणी येतात. सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईच्या विरोधात होता. आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका हेच सांगणं आहे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
द्वेष, अहंकार किंवा मुंबईवरचा राग असावा अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबईने नेहमीच शिवसेनाला साथ दिली आहे. आरेवरील, मुंबईवरील आमचं प्रेम यावर राग ठेवूनच हा निर्णय घेतलाय का हा प्रश्न आहे. हे सरकार स्थगिती सरकार होणार का? स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान होणार आहे याबद्दल विचार करावा लागेल. सरकार बदललं म्हणून स्थगिती देणं हे योग्य नाही असेही ते म्हणाले.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी पक्षादेश डावलून पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी या १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाईची करण्यात यावी अशी याचिका विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. मात्र आमदारांच्या यादीतून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं.
भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, बाळासाहेबांचा सन्मान म्हणून आम्ही आदित्य ठाकरेंचं नाव दिलेलं नाही, असे स्पष्ट केले होते.