महायुतीतील भाजपाच्या वरचष्म्यामुळे शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेल्या चार उमेदवारांची नावे मागे घेण्याची पाळी शिंदे गटावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांची नावे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी जाहिर करण्यावर भाजपाचा आक्षेप होता. तसेच काही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल भाजपाच्या हाती होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना पर्यायी नावांचा प्रस्ताव भाजपाने शिवसेना शिंदे गटाला सूचविला होता. अन्यथा पराभूत होणारे उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूकीला सामोरे जाण्याचा दुसरा एक प्रस्ताव दिला शिंदे गटाला दिला. परंतु अखेर भाजपाच्या अहवालावर अन्य उमेदवार जाहिर करण्याची पाळी आज शिंदे गटावर आली तर आधी जाहिर केलेल्या उमेदवारांची नावे मागे घेण्याची नामुष्की शिंदे गटावर आली.
भाजपाच्या अहवालानुसार शिंदे गटाचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे पराभवाच्या छायेत असल्याने त्या जागेवरून इतर उमेदवार जाहिर करावा याशिवाय यवतमाळ वाशिम मधून विद्यमान खासदार भावना गवळी यांनाही उमेदवारी देऊ नये, मुंबईतून विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि रामटेकमधून कृपाल तुमाने यांना उमेदवारी जाहिर करू नये हे सर्व उमेदवार पराभवाच्या छायेत असल्याचे सांगण्यात आले. परंतु तरीही शिंदे गटाकडून यातील काही उमेदवारांना उमेदवारी जाहिर केली होती, तर काही जण उमेदवारी जाहिर करण्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर भाजपाच्या महायुतीतील वरचष्म्यामुळे अखेर आधी जाहिर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे मागे घेण्यात आली.
यात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, गजानन किर्तीकर आणि रामटेकमधून कृपाल तुमाने यांची नामे शिंदे गटाने मागे घेत असल्याचे आज मंगळवारी जाहिर केले. त्या ऐवजी यवतमाळ वाशिम मधून भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारीची मिळणार असल्याची चर्चा जोरात आहे. तर गजानन किर्तीकर यांच्याऐवजी काँग्रेसचे बंडखोर संजय निरूपम यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कृपाल तुमाने यांना रामटेकमधून जाहिर केलेली उमेदवारी मागे घेत त्यांच्याऐवजी संजय जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
तर हिंगोली येथून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.