मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता असा दावा भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत आम्ही अभिमानाने सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केले. पण तुम्ही कोठे होतात असा खोचक सवाल करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला थेट डिवचले.
मुंबईतील सोमय्या मैदानात भाजपातर्फे आयोजित महाराष्ट्र दिन सन्मान सोहोळा सभेत फडणवीस बोलत होते. त्याचबरोबर भाजपाच्या पोलखोल रथ यात्रेचा समारोपप्रसंगी आयोजित सभेत बोलत होते. या सभेला भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, सहप्रभारी जयभान सिंह पवैया, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आशीष शेलार, अतुल भातखळकर आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत.
परवा म्हणाले बाबरी मशिद पाडली तेव्हा कुठल्या बिळात होते. हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता असेही ते म्हणाले.
एवढंच नाही, तर त्याआधीच्या कारसेवेत याच राम मंदिरासाठी १८ दिवस बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसने घालवले. आम्ही लाठी गोळी खाण्याचं काम केलं आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पाडली तेव्हा कुठं होतात? खरं म्हणजे बाबरी पडली तेव्हा महाराष्ट्रातील कोणता नेते गेला होता. एकही शिवसेनेचा नेता त्या ठिकाणी उपस्थित नव्हता असेही त्यांनी सांगितले.
आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालिसा म्हटली तर राजद्रोह होतो. राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी मला आधी सांगितले असते तर त्यांना मी माजी मुख्यमंत्री म्हणून माझ्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणायला सांगितले असते असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
पण त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला. आरोपपत्रात त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्याने ते राज्य उलथून टाकत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले असे म्हटले आहे. पण हनुमान चालिसा म्हटल्याने रामाचे राज्य उलथवले जाईल की रावणाचे? आरोप करणाऱ्यांनी तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे एकदा सांगून टाका असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले.
काश्मिरमध्ये आम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत गेल्याचे म्हटले जाते. हो आम्ही गेलो कारण त्यावेळी आवश्यकता होती. पाकिस्तानने निवडणुका घेऊ शकत नाही असे म्हटल्यानंतर आमच्या सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या. ६० टक्के मतदान झाले. त्यावेळी आम्ही मुफ्तींसोबत काश्मिरमध्ये सरकार तयार केले आणि पाकिस्तानला इशारा दिला. ज्या क्षणी हे काम झाले त्यावेळी सत्तेला लाथ मारून मेहबुबा मुफ्तींना खाली खेचण्याचे काम भाजपाने केले. पंतप्रधान मोदींनी ठणकावून सांगितले की कलमी ३७० काढण्यात येईल असेही ते म्हणाले.
Tags babari mosque demolition bjp bjp leader devendra fadnavis cm uddhav thackeray devendra fadnavis shivsena
Check Also
लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …