मुंबई : प्रतिनिधी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या व्हीडीओमुळे राज्यात भाजप बँकफूट गेली होती. मात्र ईशान्य भारतातील विजयामुळे बँकफूटला गेलेला भाजपमध्ये पुन्हा एकदा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत प्रश्न न लावण्यासंदर्भात ५० लाख रूपये स्विकारल्याचे वृत्त एका वृत्तवाहीनीने प्रसारीत केले. मात्र प्रसारीत करून काही तासांचा अवधी लोटत नाही. तोच ते वृत्तही सदर वृत्तवाहीनीने त्यांच्या रेकॉर्डवरून काढून टाकले. दरम्यान धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर सत्ताधारी पक्षाकडून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात रान उठविण्यात आले. मात्र दस्तुरखुद्द विरोधी पक्षांनी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केल्याने सरकार आणि सत्ताधारी भाजप तोंडघशी पडली. त्यातच धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाचे जोरदार खंडन करत सरकारने याप्रकरणाची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करत मी जरी दोषी आढळून आलेलो असलो तरी माझ्यावरही कारवाईची मागणी करत विधिमंडळाच्या विश्वासहार्तेबद्दल निर्माम झालेला प्रश्नही निकाली काढण्याचे आव्हान राज्य सरकारला दिले. त्यामुळे विरोधकांवर राजकिय जरब निर्माण करण्याची राजकिय खेळी सत्ताधारी पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याअंगलट आली. त्यामुळे एका झटक्यात भाजप बँकफूटवर गेली.
तर मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांच्या गाण्याच्या व्हीडीओमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे हा व्हीडीओ एका खाजगी संस्थेने तयार केलेला असतानाही त्यात मंत्र्यांबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्याने सहभाग नोंदविल्याने याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या नेमक्या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्यावर जाहीररित्या प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच जेरीस आणले. विशेष म्हणजे विरोधकांच्या कोणत्याही आरोपाला प्रतित्तुर न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या प्रश्नाची चांगलीच दखल घेत त्यास उत्तर देण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे उत्तर देवून विरोधकांवर कडी करण्याच्या नादात मुख्यमंत्री फडणवीस हे अधिकच अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले.
या राजकिय कोंडीतून बाहेर पडण्याची संधी भाजपकडून शोधली जात असतानाच ईशान्य भारतातील विधानसभांचे निकाल जाहीर होत भाजपला दिलासा मिळाला. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांच्या जीवात जीव येत आत्मविश्वास वाढल्याचे आज राज्यात दिवसभरात होत असलेल्या भाजपच्या कार्यक्रमातून आणि त्यांच्या देहबोलीतून जाणवत राहीले.