Breaking News

नाना पटोले यांचे आवाहन,… स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तरी खोटं बोलू नये एवढीच अपेक्षा

देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता तेच लोक आज सत्तेवर आहेत. या विचारधारेचे लोक दररोज संविधानाची हत्या करत आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा मानाने डौलत ठेवायचा असून संविधान व लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची तयारी ठेवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला, प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी ध्वजारोहण करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पूर्वसंध्येला काही लोकांनी काळा दिवस पाळला, या लोकांची विचारधारा पहा. या लोकांचे स्वातंत्र्य चळवळीत काहीही योगदान नाही.खोटे बोलून सत्तेत आले व मागील ९ वर्षांपासून देशाची संपत्ती विकून देश चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सर्व सामान्य जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. त्या संविधानाचा रोज खून केला जात आहे. भय, भ्रष्टाचारातून सत्ता स्थापन करायाची हेच काम सुरु आहे. ब्रिटिश राजवटीत शेतकऱ्यांनाबद्दल जी भाषा वापरली जात असे तीच भाषा आज वापरली जात आहे. जनतेला पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचे काम सुरु आहे. बलाढ्य, शक्तीशाली, अत्याचारी ब्रिटिशांना काँग्रेसने देशातून हाकलून लावले आज पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे, जनतेने सावध रहावे, सजग रहावे.

मणिपूर जळत आहे, त्यावर पंतप्रधानांनी संसदेत शब्द काढला नाही, मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली पण त्यावर चकार शब्द न काढता काँग्रेसवर टीका करत हास्य विनोद करणारा असंवेदनशील पंतप्रधान देशाने पाहिला. देशाला पुन्हा पारतंत्र्यात लोटण्याचे काम सुरु आहे, हा धोका ओळखा. भारताला महासत्ता बनवण्याचे काँग्रेसचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार रहा, असे आवाहन पटोले यांनी केले.

लाल किल्यावरून तरी खोटं बोलू नका..

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, मी पुन्हा लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवणार अशी भाषा करणारे अहंकारी आहेत. आपल्या देशात नेता मोठा नाही तर देशातील जनता मोठी आहे. कोणाला निवडून आणायचे व कोणाचा पराभव करायचा हा जनतेचा हक्क आहे. बड्या-बड्या नेत्यांचा पराभव जनतेने केला आहे, त्यामुळे ही अहंकारी भाषा अयोग्य आहे. मागील ९ वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसला शिव्या देण्याशिवाय त्यांनी दुसरे काय काम केले हे सांगावे, असा प्रश्न पटोले यांनी विचारला. आता काँग्रेसला शिव्या देऊन मोदी आपले अपयश लपवू शकणार नाहीत असा टोलाही मारला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे मित्र आहेत त्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांपासून सावध रहावे असा माझा सल्ला आहे असे नाना पटोले एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

आजच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष व आ. वजाहत मिर्झा, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष चारुलता टोकस, सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, मुनाफ हकीम, प्रमोद मोरे, देवानंद पवार, जोजो थॉमस, सय्यद झिशान अहमद, श्रीरंग बरगे, सुरेशचंद्र राजहंस, राजाराम देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *