काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे कृशीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शरद पवारांवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केला होता, असे वक्तव्य केले. या साऱ्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार कुठे आहेत? असा सवाल सत्ताधाऱ्यांसह सर्वांकडूनच उपस्थित करण्यात येत होता. अखेर अजित पवार यांनी याबद्दल सविस्तर खुलासा करत आपण लवकरच एक पत्रकार परिषद घेवून बोलणार असल्याचे सांगत कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? हे सगळं राज्यातील जनता बघतेय असे सांगायला विसरले नाहीत.
अजित पवार हे आज रविवारी बारामती येथे काही प्रसारमाध्यमाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करतं? हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत असते. काही राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करत आहेत आणि त्यातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही. अशा गोष्टी महाराष्ट्रात घडता कामा नये. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अशी विधाने व्हायला नको, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
यावेळी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासंदर्भात त्यांनी विचारण्यात आले असता, ते म्हणाले, मी चार तारखेला विदेशात गेलो होतो आणि १० तारखेला रात्री उशीरा परत आलो. ११ ताखरेला मी दिवसभर मावळमध्ये होतो. १२ तारखेला मी नगरमध्ये होतो आणि आज बारामतीत आहे. त्यासंदर्भात मी मंगळवारी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन बोलेन. मात्र, भारत जोडो यात्रेत पक्षाच्यावतीने शरद पवार जाणार होते. पण प्रकृती ठीक नसल्याने त्यांना जाणे शक्य झाले नाही. परंतु आमचे नेते जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते.
संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांची शक्यता वर्तवली आहे. त्यावरही अजित पवार म्हणाले, त्यांना जे वाटलं, त्यानुसार ते बोलले. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.