राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्यासोबत प्राथमिक स्थितीत जवळपास १० ते १२ आमदार आणि १ लोकसभेच्या खासदाराने बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे २०१९ ते २०२४ या दोन पक्षात बंडखोरी तर चाळ वेळा शपथविधी झाल्याचे चित्र राज्याच्या राजकारणात पाह्यला मिळाले.
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो. pic.twitter.com/mvZ2oh7w6u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2023
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबीरात शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय जाहिर केला. मात्र पक्षातील सर्व आमदार आणि नेते, पक्ष कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या त्या निर्णयाविरोधात आंदोलन करून पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय मागे घ्यायला लावला. त्यामुळे पक्षात सारं काही आलबेल असल्याचे दिसून येत होत. मात्र आज सकाळपासून अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर सातत्याने बैठकांचा सिलसिला सुरु झाला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडणार नाही ना अशी चर्चा सुरु झाली.
त्यातच सुप्रिया सुळे या सुरुवातीला अजित पवार यांच्या देवगिरी येथील बंगल्यावर होत्या. मात्र त्या तेथून बाहेर पडल्या. त्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल पटेल खासदार अमोल कोल्हे याच्यासह विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, संजय बन्सोड, खासदार सुनिल तटकरे, त्यांची कन्या खासदार आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शिवाजीराव गर्जे आदी जण अजित पवार यांच्यासह राजभवनावर पोहोचले. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, कु. आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे.
राजभवनात पोहोचल्यावर सर्वप्रथम राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बन्सोड, आदिती तटकरे यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.