काल विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोनाकाळात मृत पावलेल्या लोकांना सोडणार नाही असा गर्भित इशारा ठाकरे गटाला दिला. त्यास २४ तास उलटत नाही तोच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्यावर मृतांसाठी लागणाऱ्या बँगेच्या खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच माजी मंत्री तथा जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलवल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची कोणतीही माहिती आपल्याला कधीही कळाली नसल्याचे सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करणार्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाल्याने उद्धव ठाकरे गटासाठी मोठी धक्का मानला जात आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येत होता. कोव्हिड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडे करण्यात आली होती. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचं आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल विधानसभेत केला होता. हे कंत्राट तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप झाला होता.
ईडीने २१ जून रोजी विविध ठिकाणी छापेमारी केली होती. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि जवळपास १५० कोटी रुपये किमतीची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. याशिवाय १५ कोटींच्या एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. २१ जूनला ईडीने केलेल्या छापेमारीत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १५ जणांचा समावेश होता.
त्याचबरोबर माजी मंत्री तथा जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात महापालिकेच्या जमिनीवर ५०० कोटी रूपयांचे पंचतारांकित हॉटेल उभारणे तसेच सरकारी जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.