मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. कधी काळी लोकांनी मोर्चे काढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करावी आणि राजकियदृष्ट्या एकत्र यावे अशी मागणी करण्यात येत होती. तसेच सर्वात आधी टाळी कोणी कोणाला द्यावी यावरूनही सातत्याने चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या होत्या. अखेर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं खासगीत म्हटलं असल्याची माहिती आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका संदर्भात राज ठाकरेशी उद्धव ठाकरे संवाद साधण्यास तयार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी १९९० च्या पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषण संग्रहित केलेली होती. त्या वेळी टीव्ही नसल्यानं भाषणं ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड केली जात असतं. १९९० पूर्वीची बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं जर राज ठाकरेंकडे असतील तर मी त्यांच्याशी संवाद साधायला तयार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी खासगीत दिल्याची माहिती आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या १९६६ ते १९९० पर्यंतची भाषणं राज ठाकरे यांच्याकडे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामासाठी आवश्यकता असल्यास राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी खासगीत केलं असल्याची माहिती आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात बोलताना जे स्वत: लोकांचे फोन उचलत नाहीत त्यांच्या मनात या गोष्टी येतात. आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्याचा फोन राज ठाकरे उचलतात. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी फोन उचलला जाणार नाही, असा विचार करु नये, असं संदीप देशपांडे म्हणाले. २०१७ ला आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यावेळी त्यांनी फोन उचलला नव्हता, असं संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात जोर धरला होता. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अनिल शिरोळे यांनी एकाच गाडीने प्रवास केला होता. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे राजकारणात एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट नकार दिल्यानंतर याविषयीच्या चर्चांना पुर्नविराम मिळाला होता. मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे चर्चेच्या निमित्ताने का होईना एकत्र येणार असल्याने मराठी माणसांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.