एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उबाठाची आजची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी अशी खोचक टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.
आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, उबाठा गटाची आज यादी जाहीर झाली त्यामध्ये पराभवाची पायाभरणीच करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सोबत ज्या पद्धतीने अहंकाराने वागत आहेत, त्यावरून आता काँग्रेसला ही कळेल आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना ही कळून चूकले आहे की, उबाठा गट म्हणजे अहंकाराने भरगच्च भरलेला फुगा आहे, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.
सभांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कची मागणी करणाऱ्या उबाठा गटाचा समाचार घेताना आमदार आशिष शेलार म्हणाले की, लोकसभेची लढाई यावेळी “देव-देश-धर्मासाठी” आहे. त्यामुळे हिंदू “शक्तीचा” पराभव करण्यासाठी निघालेल्या अधर्मवादी “शक्तींना” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे आमचे दादरचे ऐतिहासिक मैदान हवे कशाला? असा सवाल करत उबाठा गटाला पुन्हा एकदा इंडिया आघाडी नावाचा “दहा तोंडी रावण” छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभा करुन हिंदू “शक्तीला” पराभव करण्याचे ऐलान करायचे आहे काय? असा खोचक सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांना…स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना …हे मैदान देऊ नये…! अशी मागणी करत ऐतिहासिक शिवतीर्थ तर “मावळ्यां”चे पालिकेने का पुरवावे डोहाळे या “डोम कावळ्यां”चे? अशा शब्दांत टीकाही यावेळी केली.