Breaking News

रतन टाटा उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालते बोलते विद्यापीठ उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान

रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ पुरस्कार स्वीकारून त्यांनी महाराष्ट्र शासनाची आणि पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

उद्योग विभागाच्यावतीने देण्यात येणारे ‘उद्योगरत्न’, ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्कार आज जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन राज्यपाल  बैस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव मनोज सौनिक, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

पहिला उद्योगरत्न पुरस्कार पद्मविभूषण रतन टाटा यांच्यावतीने टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी स्वीकारला.  टाटा यांना काल उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना, उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप २५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप १५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप ५ लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

यावेळी राज्यपाल बैस यांनी महत्त्वाचे ‘उद्योग पुरस्कार’ सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभागाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तरुण राष्ट्र म्हणून भारताला आज अभूतपूर्व अशी संधी आहे. जगातील अनेक विकसित देश त्यांच्या कामगारांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राने कौशल्य विकास आणि उद्योजकतेला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या पुढील २५ वर्षांच्या औद्योगिक विकासासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी व्यापारी, उद्योगपती आणि विविध चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रमुखांची उच्चाधिकार समिती स्थापन करावी, अशी सूचना त्यांनी केली.

आदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली सीरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशील्ड’ ही लस विकसित करून देशाचा नावलौकिक केला आहे. किर्लोस्कर हे उद्योगक्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. गौरी किर्लोस्कर यांना देण्यात येणारा ‘उद्योगिनी’ पुरस्कार सर्व महिला उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना दिला जाणारा मराठी उद्योजक पुरस्कार हा महाराष्ट्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा पुरस्कार आहे, असे राज्यपाल बैस यांनी यावेळी नमूद केले.

रतन टाटा म्हणजे माणसातला देव माणूस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपण कुणीही देव पाहिलेला नाही. पण, देव चराचरात आहे. गरजूंच्या मदतीला देव नेहमी धावतो. यंदाच्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी आपण अशाच एका माणसातल्या देवमाणसाची निवड केली आहे. टाटा म्हणजे अढळ विश्वास, गुणवत्तेची खात्री आणि प्रचंड सामाजिक भान असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

आपण विविध क्षेत्रात विशेष असे योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करत असतो. त्याच धर्तीवर उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी आपण उद्योग पुरस्कारांची सुरवात केली असल्याचे ते म्हणाले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या औद्योगिक प्रगतीचं ग्रोथ इंजिन आहे. या ग्रोथ इंजिनाची सगळ्यात मोठी शक्ती उद्योग क्षेत्र आहे. म्हणूनच हे उद्योग पुरस्कार देऊन राज्यातील उद्योग विश्वाचा सन्मान करण्याचे शासनाने ठरविल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगरत्न पुरस्कारासोबतच ‘उद्योग मित्र’, ‘उद्योगिनी’ आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक या चारही सत्कारमुर्तीमधील मोठे साम्य म्हणजे विश्वास हे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपल्या राज्याला उद्योगपतींच्या अनेक पिढ्यांनी घडविले. अगदी पारतंत्र्यापासून उद्योगांनी या देशासाठी योगदान दिले आहे. आज मोठ्या प्रमाणावर सेवाक्षेत्र, आयटी क्षेत्र राज्यात आणि देशात विकसित झाले आहे. उद्योग क्षेत्राने आजवर अब्जावधी हातांना रोजगार दिला आहे. आपल्याला कृषी आधारित उद्योगांना देखील राज्यात प्रोत्साहन द्यायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान द्यायचे आहे. दावोसच्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीत आम्ही १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले. त्यातील ८५ टक्के करारांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आज परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर आला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टाटा ट्रस्टने आधुनिक भारताच्या विकासात अमूल्य असे योगदान दिले आहे. जगात पाचव्या क्रमांकावर असलेला टाटा समूह महाराष्ट्रात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र प्रत्यक्ष गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे नमूद करून सर्वोत्कृष्ट मानव संसाधन महाराष्ट्रात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस म्हणाले, देशाचे स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात आहे. स्टील इंडस्ट्रीत गुंतवणूक वाढत आहे, भविष्यातील ‘स्टील सिटी’ म्हणून गडचिरोली नावारूपाला येत आहे. ट्रीलियन इकॉनॉमीची वाटचाल करताना शासन सर्व विभागांना सोबत घेऊन पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा ट्रस्ट सेवाभावी संस्था – उपमुख्यमंत्री अजित पवार

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव पुढे नेण्याचे काम हे राज्य शासन करीत आहे. टाटा ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था आहे. राज्याच्या इतिहासात उद्योग क्षेत्रातील पहिला पुरस्कार रतन टाटा यांना दिला याची नोंद ठेवली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुरस्कार मिळालेल्या सर्वांचे अभिनंदन करून आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून नवीन पिढीने उज्ज्वल काम केले असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

प्रास्ताविकात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुरस्कार सुरू करण्यामागची भूमिका विषद केली. त्यांनी उद्योग मित्र व रोजगार मित्र हे नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच उद्योग मित्र व्हॅनबाबत माहिती दिली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, उद्योजकांना पुरस्कार हा राज्य शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हे देशातील उद्योगात अग्रेसर असलेले राज्य आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाच्या बाबत दूरदृष्टी असणारे राज्य म्हणूनही ओळखले जाते. पुनावाला म्हणाले, सिरम इन्स्टिट्यूट ही देशाची, महाराष्ट्राची संस्था आहे. कोविड काळात ९० टक्के लस महाराष्ट्राने पुरविली. महाराष्ट्राची कार्य संस्कृती वेगळी आहे, त्यामुळे यापुढेही आपण महाराष्ट्रातच उद्योगाला प्राधान्य देऊ. हा पुरस्कार राज्य, देश तसेच सिरम इन्स्टिट्यूट मधील कामगार आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार असल्याचे त्यांनी सांगितले.

गौरी किर्लोस्कर यांनी उद्योग क्षेत्रात महिलांसाठी समान संधी निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाचे आभार मानले. उद्योग क्षेत्रातील आजोबा व वडिलांचे योगदानाचा उल्लेख करताना भारताच्या निर्माणशक्तीवर त्यांचा विश्वास होता, असेही त्या म्हणाल्या.

शिंदे म्हणाले, मी एक शेतकरी असून शासनाने मराठी उद्योजक पुरस्कार दिल्यामुळे यापुढे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळण्याकडे वाटचाल सुरू झाली, असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांनी एकीने शेती केली तर शेतीत निश्चितच बदल घडू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम योजनेंतर्गत यशस्वी उद्योजकांच्या यशकथांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे यांनी तर आभार डॉ. हर्षदीप कांबळे यांनी मानले.

Check Also

या दोन बँकांनी जारी केले भागधारकांसाठी डिव्हिडंड आरबीएल आणि आयसीआयसीआय बँकेने दिले मोठे गिफ्ट

आर्थिक वर्ष संपत आल्याने प्रत्येक संस्थांकडून त्यांच्या वित्तीय वर्षाचा जमा-खर्च सादर करण्यात येत आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *