Breaking News

अर्थमंत्री सीतारामण यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर, पण घोषणा केल्याच

आगामी लोकसभा निवडणूकांना आता अवघ्या एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित केंद्र सरकारचा हा शेवटचा तर निर्मला सीतारामण यांच्याकडून सहावा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आला. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून विविध विभागांकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांसाठी आणि विभागांच्या खर्चासाठी फक्त लेखाअनुदान मंजूर करणे अपेक्षित असताना आगामी लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकांना खुष करण्यासाठी काही घोषणा केल्याच.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना म्हणाल्या की, देशातील युवतींना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणार असलेल्या लेक लाडकी या उपक्रमातांर्गत देशातील तीन कोटी युवतींना लखपती बनविणार असल्याची घोषणा केली. वास्तविक पाहता मुलींची संख्या वाढावी यासाठी याच सरकारनकडून बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा देत नवी योजना जाहिर केली होती. मात्र आता मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मुलींच्या ठराविक वयाच्या अंतराने काही रक्कम देत वयाच्या १८ व्या वर्षी किमान १ लाख रूपये देण्यात येणार आहेत.

मध्य प्रदेशात याच योजनेमुळे सत्तेवरून जाणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा जनतेने हात देत सत्तेवर विराजमान केले. त्यामुळे याच योजनेची व्याप्ती वाढवित देशातील तीन कोटी युवतींना लखपती करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

याशिवाय निर्मला सीतारामण यांनी सोलर वीजेचा वापर करणाऱ्या नागरिकांना सोलर यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान देण्याची घोषणा करत जवळपास ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली. वास्तविक पाहता सोलर वीज निर्मितीसंदर्भात यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने नवी योजना तयार करत नागरिकांकडून वापरण्यात येणाऱ्या सोलर वीज मोफतच मिळते. तसेच सोलर वीजेच्या माध्यमातून अतिरिक्त वीजेची खरेदी महावितरण विभागाकडून करण्यात येते. मात्र महावितरणने सोलर पॉवरला परवानगी देण्याआधी महावितरण विभागाचे बील शुन्य करा अशी अटही घालण्यात आली आहे. तसेच २५०० रूपयांचे किमान वीज बील भरणाऱ्या ग्राहकांनाच सौर ऊर्जा वापराची परवानगी देण्याची भूमिका आतापर्यंत महावितरणकडून घेण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. त्यामुळे आधीच विविध राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ऊर्जा विभागाकडून अशी भूमिका घेण्यात येत असल्याने आधीच मोफत वीज उपलब्ध होणाऱ्या सौर ऊर्जेला ३०० युनिटची वीज मोफत देणार असल्याची घोषणा करणे ही धांदात थाप मारल्याचे दिसून येत आहे.

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३ कोटी घरे बांधण्यात आली आहेत. तर पुढील पाच वर्षात २ कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा करत मध्यमवर्गासाठीही घरांची योजना पुढील अर्थसंकल्पात जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी केली.

यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, कर रचनेतील स्लॅबमध्ये कोणताही बदल सध्या करण्यात आला नसल्याचे सांगत २०१० च्या १० हजार करपरतावा आणि २०१० ते २०१४ या कालवधीतील २५ हजार रूपयांच्या करपरताव्याची मागणी केंद्र सरकारकडून सोडून देण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातंर्गत सध्या वाढलेल्या वित्तीय तूटीच्या पार्श्वभूमीवर वित्तीय तूट ४.५ टक्क्यांवर रोखण्यात यश मिळविणार असल्याचे सांगत देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने विकासाच्या मार्गावर चालणार असल्याचेही सांगितले.

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या की, जून्या रेल्वेच्या प्रवाशी डब्याचे वजन जास्त असल्याने या गाड्य़ा पुरेशा धावू शकत नाही. त्यामुळे वंदे भारत या एक्सप्रेसला असलेल्या प्रवासी वाहतूक डब्यांच्या धर्तीवर नवे प्रवाशी डबे निर्माण करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

पुढे बोलताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, संशोधन आणि कल्पकतेसाठी १ लाख कोटी रूपयांचा निधी उभारण्यात येणार असून वित्तीय संस्थांना ५० वर्षासाठी शुन्य टक्के दराने वित्त पुरवठा करण्यात येणार आहे. जेणे करून या कर्जाचे वाटप वित्तीय संस्था यांच्याकडून करण्यात येऊन त्याची वसुलीही याच वित्तीय संस्थानी करून पुन्हा त्याचे कर्ज वाटप करण्याकरिता हा निधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारकडून सुतोवाच

येत्या काही दिवसांत सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येण्याची शक्यता आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *