Breaking News

पंडित शिवकुमार शर्मांवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या या भावना

भारतीय संगीताच्या मानबिंदूचा अस्त-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पं.शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली
संतूर या वाद्याची जगाला ओळख करून देणारा, संतूरच्या अलौकिक तरंगांनी जगाला भुरळ घालणारा भारतीय संगीत क्षेत्राचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ संगीतकार, संतूरवादक पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांना निधनाबद्दल श्रद्धांजली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अर्पण केली.
पंडित शर्मा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत.
पंडित शर्मा आणि संतूर वाद्य यांचे अतूट असे नाते आहे. त्यांच्या नावानेच संतूरला ओळख मिळाली. तर भारतीय संगीताला संतूर मिळाले. पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतीयांनाच नाही, तर जगाला भुरळ घातली. जम्मू काश्मिरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, तर याच भूमीतील संतूर या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय अशा तरंगांची पंडितजींनी जगाला ओळख करून दिली. जगभरात जिथे भारतीय संगीत पोहचले आहे, तिथे संतूर पोहचले. हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे. विनम्र स्वभावाच्या पंडित शर्मा यांनी संगीत क्षेत्राची अखंड सेवा केली. पंडित शर्मा यांचे योगदान भारतीय संगीत क्षेत्राला कदापिही विसरता येणार नाही. शिवकुमार शर्मा हे भारतीय संगीत क्षेत्राच्या मानबिंदूपैकी एक होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा एक मानबिंदू अस्ताला गेला आहे. पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मां यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

पंडितजींच्या ‘संतूर’ सूरांशिवाय भारतीय संगीत अपूर्ण- उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मांच्या ‘संतूर’वादनानं कोट्यवधी संगीतरसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. पंडितजींनी ‘संतूर’सारख्या काश्मिरी लोकवाद्याला भारतीय संगीतात मान मिळवून दिला. त्यांच्या ‘संतूर’वादनानं भारतीय संगीतविश्व खऱ्या अर्थानं समृद्ध झालं. पंडितजींच्या ‘संतूर’ सूरांशिवाय भारतीय संगीत अपूर्ण आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनानं भारतीय अभिजात संगीताला नवी ओळख, जागतिक लोकप्रियता मिळवून दिली. पंडित हरीप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आणि पंडित शिवकुमार शर्मांच्या संतूरवादनाची जुगलबंदी हा भारतीय संगीतातला अनमोल ठेवा आहे. पंडितजींचं निधन ही भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी असून, पंडीतजी आणि त्यांचं संतूरवादन भारतीय संगीतात अजरामर आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

 

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *