सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अपयशी ठरला आहे. त्यामुळेच जनतेला शासनाच्या दारी जावे लागत आहे. परंतु शासनाने जनतेची तिथेही अडवणूक केली आहे. मंत्रालयात होत असणाऱ्या आंदोलनाचा सरकारने धसका घेतला असून मंत्रालय प्रवेशासाठी जाचक नियम बनवले आहे. सरकारचे हे अपयश असून मंत्रालयाबाहेरच्या रांगा म्हणजे राज्यात जनतेची कोणतीही कामे होत नसल्याचा पुरावा आहे. अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. सुरक्षेची कारणे देत सर्वसामान्यांना मंत्रालयाबाहेर ताटकळत उभे केले जात आहे. त्यामुळे संध्याकाळी उशिरापर्यंत नागरिक ताटकळत उभे राहतात. त्यांना सायंकाळी प्रवेश मिळाल्यावर कार्यालयीन कामकाजाची वेळ संपते. त्यामुळे हताश होऊन नागरिक परत जात आहेत. नागरिकांचे हाल सरकारने थांबविले पाहिजेत.
शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधी रुपये खर्च या सरकारने केला आहे. या उपक्रमात जनतेची कामे झाली असती तर त्यांना मंत्रालयापर्यंत येण्याची गरज पडली असती का ? असा सवाल करत शासन आपल्या दारी उपक्रम पूर्णपणे अयशस्वी झाला. केवळ प्रसिद्धीसाठी हा कार्यक्रम राबविला जात टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.