Breaking News

नवाब मलिक शरद पवार की अजित पवार गटात जाणार? कप्तान मलिक म्हणाले, ते सर्वात आधी… दोन दिवसांनी आराम करून किडनी स्पेशालिस्टला भेटणार

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक यांना नुकताच वैद्यकिय कारणास्तव दोन महिन्याचा जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रत्येक गोष्टीसाठी विरोध करणाऱ्या ईडीने नवाब मलिक यांच्या दोन महिन्याच्या जामीन अर्जाला विरोधही केला नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसपासून अर्थात शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी भाजपा प्रणित सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे त्यांच्यासोबत जे गेले त्या सर्वांना ईडीपासूनच्या कारवाईपासून दिलासा मिळाला आहे. तसेच नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी जल्लोष साजरा केला. यापार्श्वभूमीवर सध्या जामीनावर बाहेर आलेले नवाब मलिक हे अजित पवार यांच्या गटात जाणार की शरद पवार यांच्या गटात जाणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत. त्यावर नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांनी वक्तव्य करत माहिती दिली.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर दीड वर्षांनी नवाब मलिक यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारपासूनच रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील अनेक नेते सोमवारपासून नवाब मलिक यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत आहेत. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी आज नवाब मलिक यांची भेट घेतली. तर शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी देखील नवाब मलिक यांची भेट घेतली.

नवाब मलिक यांचे बंधू आणि माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी काही वेळापूर्वी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना बोलत असताना नवाब मलिक यांच्या तब्येतीची माहिती दिली.

कप्तान मलिक यांनी सांगितलं की नवाब मलिक यांचं गेल्या दीड वर्षात २५ ते ३० किलो वजन घटलं आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. किडणी तज्ज्ञाची भेट घेऊन आम्ही यावर चर्चा करणार आहोत. तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे पुढील उपचार केले जातील. आमच्यावर देवाची कृपा झाली आणि दोन महिन्यांसाठी का असेना आमचा भाऊ घरी परतला आहे. नवाबभाई हे माझ्यासाठी वडिलांसमान आहेत. वडील गेल्यावर त्यांनीच आम्हाला वडिलांप्रमाणे प्रेम दिलं.

पुढे बोलताना कप्तान मलिक म्हणाले, किडनी तज्ञाची भेट घेतल्यानंतर पुढील निर्णय नवाब मलिक विचारपूर्वक घेतील असे सांगत कोणत्या गटात जायचे याचा निर्णय नवाब मलिक यांच्यावरच सोडून दिला.

दरम्यान, अजित पवार गटाच्या प्रवक्त्याने नवाब मलिक हे आतापर्यत विकासाच्या मुद्यावर चालत आले आहेत. त्यामुळे यापुढेही ते अजित पवार यांनी स्विकारलेल्या विकासाच्या मार्गाने येतील आणि आमच्यासोबत काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *