Breaking News

लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०२४ ला मीच पुन्हा भाषण करणार आधी महिलांविषयी विचारधारा बदलण्यासाठी मदत तर आता पुन्हा भ्रष्टाचाराची लढाई लढण्यासाठी आशिर्वाद मागितला

गतवर्षी महिलांबद्दल असलेल्या विशिष्ट दृष्टीकोन असलेल्या समुदायाने आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढण्यासाठी आपली साथ हवी अशी साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी लाल किल्ल्यावरून घातली होती. त्यात आज पुन्हा नव्याने काही गोष्टी समाविष्ट करत पुन्हा एकदा यावेळीही आपला काँग्रेस विरोधाचा आलाप आळवत देशातील परिवार वाद आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईसाठी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत आपणच परत येणार असून त्यासाठी आपला सर्वांचा आशिर्वाद हवा आहे अशी भावनिक साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यादिना निमित्त आयोजित कार्यक्रमात देशाला संबोधताना मागणी केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला लाल किल्ल्यावरुन १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. तसंच काँग्रेसवर कडाडून टीका ही केली. भ्रष्टाचाराच्या राक्षसाने आपला विळखा देशाभोवती घातला होता आणि देशाला घट्ट पकडून ठेवलं होतं असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तर दुसरीकडे पुढच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्येही आपणच लाल किल्ल्यावरुन भाषण करु असा विश्वासही व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, २०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही असं सांगत पुढच्या टर्मसाठी आपणच पंतप्रधान पदी असा दावा केला.

आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरचाही उल्लेख केला. मणिपूरमध्ये आणि हिंदुस्थानच्या इतरही काही भागात हिंसाचार झाला. आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लावण्यात आला. देश मणिपूरच्या पाठिशी आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार आहे. मणिपूरमध्ये केंद्र आणि राज्य सरकार शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आणि करत राहू असंही सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आज देशातील तरुणांना जेवढे भाग्य लाभले आहे तेवढे क्वचितच कुणाला मिळते.आपण ते गमावू नये. येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा असणार आहे. आपली छोटी शहरे आणि शहरे लोकसंख्येच्या दृष्टीने लहान असतील पण त्यांची क्षमता कोणापेक्षाही मागे नाही. देशात संधींची कमतरता नाही. आपल्याला पाहिजे तितक्या संधी देण्याची क्षमता या देशामध्ये आहे.बदलत्या जगाला भारत आकार देणार आहे.

दरम्यान, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करताना गुजरातमधील बिल्कीस बानो या मुस्लिम महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना गुजरात सरकारने माफी दिली होती. त्याबाबत ते काहीही बोलले नाहीत. याशिवाय देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आदी प्रश्नांबाबत कोणतेही ठोस वक्तव्य करण्याचे टाळल्याचे दिसून आले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *