Breaking News

नाना पटोले यांचा टोला, भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार?

देशातील आणिबाणीवरून नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले. त्याचबरोबर भाजपाकडूनही आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपाच्या टीकेला प्रत्त्युतर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? असा टोला लगावत भाजपाने आधी नीट अभ्यास करायला पाहिजे असा खोचक सल्लाही दिला.
टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. त्यावेळी पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या परिस्थितीत आणिबाणी लागू केली होती याचा भाजपाने नीट अभ्यास करायला पाहिजे. भाजपाला इतिहासच नाही त्यावर ते काय बोलणार? १९७५ मध्ये अमेरिका-व्हिएतनाम युद्ध सुरू होते आणि त्याच वेळी देशामधील लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी काही लोकांनी षडयंत्र रचले होते, काही लोक जाणीवपूर्वक चिथावणी देत होते. इंदिराजींनी आणिबाणी लावली नसती तर देशात लोकशाही राहिली नसती असेही सांगितले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, इंदिरा गांधी यांनी १८ महिन्यानंतर आणीबाणी उठवली व निवडणुकाही घेतल्या. इंदिरा गांधी लोकशाहीच्या पाईक होत्या म्हणून लोकशाही वाचली. काँग्रेस पक्षाने आणिबाणीबद्दल नंतर माफीही मागितली. पण आता देशात काय चालले आहे? आणिबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती आहे. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून कारभार सुरु आहे. ९ वर्षापासून देशात अघोषीत आणिबाणी सुरू आहे. त्यावर भाजपाने आधी बोलले पाहिजे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणा-यांवर कारवाई केली जाते, सरकारी तपास यंत्रणाचा वारेमाप गैरवापर सुरु आहे, विरोधकांची दडपशाही सुरु असून सरकार विरोधात बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. आणीबाणीच्या नावाखाली भाजपा तरूणांना भडकवत असल्याचा आरोप करत तो थांबवावा असे सांगत भाजपाला आणिबाणीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही लगावला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *