Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, एअरबस प्रकल्पासाठी रतन टाटांना पत्र लिहिले…

सुमारे २२ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असतांना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक महत्वाचे प्रकल्प हे इतर राज्यात पळविले जात आहे, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून सदरचा प्रकल्प हा नाशिकच्या एचएएल कंपनीत राबविण्यात यावा अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्येच पत्राद्वारे केली होती अशी माहिती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.

छगन भुजबळ यांच्यासोबत आज नाशिक येथील कार्यालयात माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर २०२१ मध्ये भारतसरकारने देशात गुंतवणुकीसाठी एअरबस या कंपनीशी २२ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. या विमान बनविणाऱ्या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. याबाबत लगेचच दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा प्रकल्प नाशिकच्या ओझर मध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा तुम्हाला लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवू अशी विनंती आपण रतन टाटा यांच्याकडे पत्राद्वारे केली असल्याचे सांगत हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अनेक प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला डावलल जात आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही बाब अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित रहायचे का असा सवाल उपस्थित केला.

ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सद्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून दिल्लीत आपल वजन वापरून यापुढे तरी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात आहे. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असून देशाचे नेते हे संपूर्ण राष्ट्राचे नेते आहे. त्यांनी केवळ गुजरातचे नेते म्हणून मर्यादित राहू नये अशी टीका त्यांनी यावेळी केली.

नोटावर महापुरुषांचे आणि देवी देवतांचे फोटो लावण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, अतिवृष्टी यासह अनेक प्रश्न समोर असतांनाही नको त्या प्रश्नांना उकळ्या फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, दुर्गम भागातील शाळा बंद करू नयेत, आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शाळा गरजेच्या आहे. त्यांना चांगलं शिक्षण मिळत का नाही हे प्राधान्याने बघावे शाळांचा दर्जा वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते म्हणाले की, नाशिक मुंबई रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाल्याने आपण गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांना तातडीने खड्डे बुजविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास एक नोव्हेबर पासून टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. अद्यापही बरेच काम बाकी आहे. आमचे या कामाकडे बारकाईने लक्ष आहे. आंदोलनाची देखील तयारी आमची पूर्ण झालेली आहे. काम न झाल्यास टोल बंद करण्यासोबत नॅशनल हायवे कार्यालय आणि संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांमध्येही आंदोलन करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच नितीन गडकरी यांनी एक वर्षांपूर्वी नाशिक येथील कार्यक्रमात नाशिक मुंबई हायवे हा काँक्रीटीकरण सिक्सलेन करू असे आश्वासित केले होते. या कामासाठी आगामी काळात पाठपुरावा केला जाईल. तसेच हे काम जर लवकर होणार नसेल तर दरपाच वर्षांनी या चौपदरी रस्त्यांचे नुतनीकरण करण्याची अट आहे. त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योगपती रतन टाटा यांना पाठविण्यात आलेले हेच ते पत्र

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *