राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, धनगर तसेच ओबीसी समाजाची राज्यभर आंदोलने सुरू असून मराठा धनगर समाजाच्या बैठकीनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील बैठक बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
जालन्यात मराठा समाजासाठी तर अहमदनगर मधील चौडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. पैकी मराठा समाजासाठी बैठक घेवून तसेच प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन तूर्तास थांबविले. तद्वतच धनगर समाजाचे मागील पंधरा दिवस केलेल्या उपोषण आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी माजी न्यायमुतींची समिती स्थापन करण्याचा निर्णय आज घेतला.
सदर बैठक संपते न संपते तोच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करीत ओबीसी आंदोलनांची आठवण करून देत या प्रश्नावरदेखील बैठक घेण्याची मागणी केली.
ओबीसीच्या प्रश्नावर रवींद्र टोंगे १० दिवसांपासून उपोषण करीत असून त्याची प्रकृती खालवत चालली आहे राज्यात ५२ टक्के ओबीसी समाज असून त्याची भेट घ्यावी कीव सरकारचे प्रतिनिधी पाठवावेत तसेच ओबीसी नेत्यांसोबत बैठक घ्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकरच बैठक बोलवण्याचे मान्य केले आहे असे वडेट्टीवार म्हणाले.