अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु केले. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय बावसकर यांनी जरांगे पाटील यांच्यापासून वेगळं होत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपध्दतीवरच आरोप करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी या सगळ्या बदनामीच्या मागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याचा आरोप केला. त्यानंतर बळी घेण्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत असल्याचा आरोप करत माझा बळी हवाय तर मीच सागर बंगल्यावर येतो असे सांगत उपोषणस्थळावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे निघाले.
त्यातच राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारी २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपावर प्रतिक्रिया विचारली असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात जेव्हापासून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार सत्तेवर आले आहे. तेव्हापासून दोन समाजाचा भांडणे लावण्याचे प्रकार वाढले आहे. मराठा आऱक्षणाच्या निमित्तानेही राज्य सरकारने मराठा समाज आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राज्य सरकारचा हा डाव फसल्याचेच हे द्योतक असल्याची टीकाही केली.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखादा आंदोलक जर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अशा पध्दतीचे आरोप करत असेल तर हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे अशी मागणी करीत हे सगळ सरकारने उभं केलेले आहे त्यामुळे याप्रकरणीही सरकारनेच उत्तर द्यावं अशी मागणीही यावेळी केली.