अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार होती. भाजपा आणि शिंदे गटाकडून मोठ्या थाटा-माटात मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारीही भरला. परंतु त्यास दोनच दिवसाचा अवधी लोटत नाही तोच भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातून ही घोषणा केली. यानंतर भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले, असताना त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुरजी पटेल म्हणाले की, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. मी दबावामुळे अर्ज मागे घेतला नाही. कोणाचाही माझ्यावर दबाव नव्हता. तसेच, अपक्ष देखील लढणार नाही. पुढील काळात अंधेरीच्या जनतेची सेवा करत राहीन.
केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी माघार घ्यायचं ठरवलं. मी तातडीने पक्षाचा आदेश मानला आहे. आम्ही पक्षाचे कट्टर कार्यकर्ते आहोत. आमच्यासाठी भाजपा आमची आई आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबाबत निराश नाही. तसेच, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही असेही ते म्हणाले.
दरम्यान, मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय भाजपाने जाहिर केल्यानंतर मुरजी पटेल समर्थक आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. हा पक्षाचा चुकीचा निर्णय असल्याची भावनाही व्यक्त केली.