शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर शिंदे यांच्या पाठोपाठ पक्षातील ४० आमदार आणि समर्थक अपक्ष असे मिळून ५० आमदार गेले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे आज मनमाड येथे आले. त्यामुळे बंडखोर आमदार सुहास कांदे हे चांगलेच आक्रमक होत आदित्य ठाकरे यांना आव्हान देत माझ्या प्रश्नाची उत्तरे दिल्यास मी तात्काळ राजीनामा देणार असल्याचे जाहिर केले. तसेच मला जर भेट नाही दिली तर मी लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करणार आणि त्यांची भेट घेणार असल्याचेही जाहिर केले.
मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना दिले. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता केली.
जी वचनं होती ती पूर्ण केलेली आहेत आणि अजूनही करत आहोत. पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही समजलेलं नाही. याआधी मी मनमाडमध्ये आलो होतो. आपले सरकार आले तर पाणीपुरवठा योजनेचा पाठपुरावा करेन, असे मी आश्वासन दिले होते. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करुन दिले. पण स्वत:साठी काहीही आरोप केले जात आहेत. या टीकांना मी उत्तरं देत बसणार नाही. गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते असेही ते म्हणाले.
शिवसैनिकांनी प्रश्न विचारले असते तर मी उत्तर द्यायला कटीबद्ध आहे. पण गद्दांराना मी उत्तर देणार नाही. गद्दारांनी गद्दारी का केली, याचं उत्तर अगोदर द्यावं. पर्यटन खात्याला कधीही निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या सरकारने पर्यटन खात्याला १७०० कोटी रुपये दिले. मनमाडमध्ये मी आठ कोटी रुपयांचा फंड दिल्याची माहितीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.