मी इतकी वर्षे राजकारणात आहे. तसेच नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी राबत आलो आहे. कधी शेतकऱ्यांना फसवलं नाही. परंतु सध्या काही जणांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर केलं जात. त्याच्या नावाचे पैसे भलत्याच्याच खात्यावर जमा होते आणि नंतर तिसराच कोणीतरी ते पैसे उचलतो. अशा गोष्टी कोणी नेताच करत असेल त्याची माहिती द्या त्याचा कसा बंदोबस्त करायचा हे मला चांगलेच माहित आहे असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना इशारा दिला.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार बोलत होते. यावेळी सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांची फसवणूक करणारा कोणी धनवान नेता असेल. तर त्याचीही माहितीही द्या. त्यांचाही बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगलेच ठावूक आहे असा गर्भित इशाराही दिला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्याचे जेव्हाही शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे दिसून आले. त्या वेळी त्याला मदत करण्याची भूमिका आपण स्विकारली. तसेच केंद्रात कृषीमंत्री पदी असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या. त्यावेळी शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे कळताच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दिल्याचे सांगितले.
तसेच शरद पवार म्हणाले की, पण काही नेते शेतकऱ्यांना फसवित असतील तर ते योग्य नाही. त्यामुळे त्या संदर्भातील कोणतीही माहिती असेल ती संजय कडे द्या त्या माहितीचे काय करायचे ते मी बघतो असा इशाराही दिला.
तसेच विकासाच्या मुद्यावर तुमची आणि माझी जी दोस्ती झाली आहे. ती कधीच तुटणार नाही अशी ग्वाहीही शरद पवार यांनी दिली.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हणाले, मी पंडित नेहरू यांच्यापासून ते राजीव गांधी यांच्यापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐकली. पण त्यांनी कधीच स्थानिक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर कधीच टीका केली नाही. पण आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने स्थानिक मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात असे सांगत हे योग्य नसल्याचेही स्पष्ट केले.