अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाचा मुद्दा हरकतीच्या मुद्याच्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपावरून विधानसभा सभागृहात सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना पाह्यला मिळाला. त्यातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण हे शोधून काढण्यासाठी एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. मामत्र भाजपाच्या आमदारांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि राजेश टोपे यांचे अप्रत्यक्ष नाव घेत संशयाचे वातावरण निर्माण केले.
यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की, जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासारख्या एखाद्या जबाबदार पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवं असा शहाजोगपणाचा सल्ला दिला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, जबाबदार लोकांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्रीपदासारख्या एखाद्या जबाबदार पदावर बसल्यानंतर त्या व्यक्तीने जबाबदारीने बोलायला हवं. त्यांचं वक्तव्य हे पोरकटपणाचं आहे. एखादी जबाबदार व्यक्ती इतखं खोटं बोलताना मी यापूर्वी कधी पाहिलं नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचं वर्तन पाहिलं आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अशा प्रकारचं वर्तन मी कधी पाहिलं नव्हतं अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना भेटायला मी गेलो होतो. त्यावेळी त्यांना भेटून तुमच्या मागण्या मी समजू शकतो. परंतु तुमच्या मागण्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी भूमिका मांडू नका. महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य टिकेल अशी भूमिका ठेवा. इतर समाजाप्रती असलेली कटुता योग्य नाही हे त्यांना मी त्यांना म्हणालो होतो. त्यांची मदत सरकार घेत होतं, हा प्रश्न सोडविण्यासाठी आणि आता त्यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. वाट्टेल ती चौकशी नेमा, त्याला आम्ही घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला असेही यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, काही कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जातोय, शासकीय, निमशासकीय नोकरदारांना नोकरीवरुन काढून टाकू अशी धमकी दिल्या जातात. कुणी दमदाटी करीत असेल तर आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत असे सांगत शरद पवार यांनी मराठा समाजाच्या तरूणांना आश्वास्त केले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, तुम्हाला जी चौकशी करायची असेल तर अवश्य करा. त्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक करा, एसआयटी नेमा, तुम्हाला वाट्टेल ते करा आणि चौकशी पूर्ण करा. कर नाही त्याला डर कशाची? आमचा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. सत्ताधारी लोक म्हणत आहेत की, फोन केले होते, तसं वाटत असेल तर आमचे फोन तपासा आणि मनोज जरांगेंसह त्यांच्या सहकाऱ्यांचे फोन तपासा. माझ्या फोनवरून एक जरी फोन केल्याचं सिद्ध झालं तर तुम्हाला वाट्टेल ती गोष्ट मी मान्य करेन असेही यावेळी ठणकावून सांगितले.