ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढत आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यातून भाजपावर हल्लाबोल केला.
इंदापूर येथे आज शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रियाताई सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. आज २०२४ वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही. सरकारने कांदा निर्यातंबदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला. कापूस उत्पादक हवालदिल झाला. पण सरकारला त्याची काहीच काळजी नाही. पंतप्रधानांवर टीका केली, म्हणून दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत. आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवले. उद्या तुम्ही विरोधात भूमिका घेतली, तर तुमचेही खाते बंद करतील. आघाडीचे उमेदवार निवडून आणणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असेही सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती ९८ टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे, असे शरद पवार साहेब म्हणताच, साहेब एक नंबरला नाव आहे असा आवाज गर्दीतून आला. चला एक नंबर तर एक नंबर. मला नंबर माहिती नाही. माझा नंबर खालून असायचा. असो, पण काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आज आपलं चिन्ह बदललं तुतारी लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा असे आवाहन यावेळी इंदापूरकरांना केले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, आपण साखर निर्यात करतो. त्यातून दोन पैसे जास्त मिळतात. पण, केंद्राने सांगितलं की तुम्हाला साखर निर्यात करायची असेल तर आम्ही निर्यातीवर कर आणि जीएसटी लावू. त्याचा परिणाम असा झाला की आज कारखान्यात साखरेचे पोते पडून आहे. यावर तोडगा म्हणून पंतप्रधानांनी इथेनॉल करायला सांगितले. कारखान्यांनी तयारही केले नंतर मात्र बंधन घातले. याचा मोठा फटका कारखान्यांना बसला यावरून दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आता चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला करा असेही सांगितले.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहे. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला. आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. केजरीवाल चमत्कारिक मुख्यमंत्री. त्यांनी लोकांसाठी अनेक चांगली कामे केली. आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत कशासाठी तर पंतप्रधानांवर टीका केली म्हणून. दिल्लीत केजरीवाल अतिशय लोकप्रिय आहेत. आज तेच तुरुंगात आहेत. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. आज संकटाचं चित्र देशात दिसत आहे. हे चित्र बदलायचं आहे. यासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची असल्याची भूमिकाही यावेळी व्यक्त केली.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, दिल्लीत शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले. पण मोदी सरकार त्यांच्याकडे पहायलाही तयार नाही. काँग्रेसचे बँक खाते सुद्धा या लोकांनी गोठवले. व्यवहार बंद केला. उद्या तुमचंही खातं ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. यासाठी या लोकांचा पराभव करा असे आवाहनही यावेळी केले.
इंदापूरमध्ये जोरदार तुतारी वाजेल ही माझी गॅरंटी- सुप्रिया सुळे
यंदाच्या निवडणुकीत इंदापूरात जोरदार तुतारी वाजणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. माझ्यावर टीका करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. सहा महिन्यांपूर्वीच आपला घटस्फोट झाला आहे. त्यामुळे माझ्यावर टीका करताना विचार करून टीका करा. कारण आपण एकाच ताटात जेवत होतो. मलिद्यात मी वाटेकरी नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करणाऱ्यांना चेतावणी देते. माझ्यावर आरोप करायचा असेल तर मी इंदापूरच्या चौकात येते. तुम्ही पण या म्हणाल त्या विषयावर चर्चा करू असा खुला इशाराही यावेळी दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात सध्या दमदाटी केली जात आहे. पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका, असे सांगितले जात आहे. पण मला सांगायचं आहे की, हा इंदापूर तालुका आहे. इथे शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. इथले लोक फोनला, धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण यंदा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार आहे असा सूचक वक्तव्यही यावेळी केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातील केंद्र सरकार शेतकरी विरोधात आहे. चुकीची इथेनॉल पॉलिसी केल्यामुळे तुमचे हक्काचे ३०० रुपये या केंद्र सरकारमुळे गेल्याचा आरोपही केला.
भारताचा आधार शरद पवारांच्या रूपाने बारामतीत- संजय राऊत
कांद्याला, दुधाला भाव नाही, भाव आमदाराला आहे. आम्हाला अच्छे दिन नकोय. आम्हाला २०१४ च्या आधीचे दिवस हवे आहेत. अजित पवार गेल्याने झाडाचे पान देखील हलले नाही. एकनाथ शिंदे गेल्याने शिवसेना मजबूत झाली. जे महाविकास आघाडीला सोडून गेले त्यांना जनता जागा दाखवेल. आजही लोकांना वाटत की, शरद पवार कृषी मंत्री आहेत. या भारताचा आधार शरद पवारांच्या रूपाने बारामतीत आहेत, असे संजय राऊत यानी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते आहे. ते म्हणाले मी पुन्हा आलो आणि दोन दोन पक्ष फोडून आलो. काय हे क्वालिफिकेशन, लोक विकास करून येतात. मी त्यांना सांगतो चार महिन्यात सरकार बदललेले असेल. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार नसेल. ईडी आणि सीबीआय आहेत. त्या काही दिवसांनी आमच्याकडे येणार आहेत. तुमचा पक्ष शिल्लक राहतो का ते बघा, असा टोलाही यावेळी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची ही निवडणूक- बाळासाहेब थोरात
भारतीय जनता पक्षाची निवडणुकीची तयारी वेगळी आहे. विरोधकांना तुरुंगात डांबायचे. त्यांच्यावर ईडी, सीबीआय सोडायचे, ही भारतीय जनता पक्षाच्या निवडणुकीची तयारी आहे. भाजपा पुन्हा निवडून आली तर २०२९ ची निवडणूक रशिया प्रमाणे होईल. समोर एकही विरोधक नसेल फक्त एकाच व्यक्तीला मतदान करावे लागेल. पण भाजपा नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे की तुम्ही विरोधकांना तुरुंगात डांबू शकता. मात्र जनतेला डांबू शकत नाही, असा इशारा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला दिला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शरद पवारांनी कोणत्याही सत्तेसाठी लढण्याचा निर्णय घेतलेला नाही. तर लोकशाही तत्त्व, पुरोगामी महाराष्ट्राचे तत्त्व, शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार. जो बहुजनांचा विचार आहे. बहुजन समाजाचा विचार हा आपला विचार आहे. राज्यघटनेचा विचार आहे. राज्य घटनेतील तत्त्व हे आमचे तत्त्व आहेत, आणि त्यांची पाठराखण करणे ही आमची जबाबदारी आहे. याची जाणीव ठेवून शरद पवार धावपळ करत आहेत, असे म्हणाले.