देशातील लोकसभा निवडणूकीला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्या पार्श्वभूमी वर काँग्रेस आणि भाजपा नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. तसेच भाजपाला अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी निवडणूक जेवढी सोपी समजतात तेवढी ती सोपी राहिलेली नसल्याचा इशारा देत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आल्यानंतर काय होते हे कसबा विधानभेच्या पोटनिवडणूकीत काय होते हे दिसले असल्याची आठवण भाजपाला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी करून दिली.
पुणे येथील नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील वाडेश्वर कट्ट्यावर प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज चव्हाण, ‘निर्भय बनो’ आंदोलनाचे प्रमुख विश्वंभर चौधरी, माजी आमदार मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाची चर्चा कट्ट्याच्या सुरुवातीलाच रंगली.
या वेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘घटनेच्या शेड्युल दहानुसार निर्णय दिला गेला, तर शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील आणि दिल्लीवरून निकाल आला, तर होणारा निर्णय हा सगळ्यांना माहितीच आहे अशा उपरोधिक टोलाही विधानसभा अध्यक्षांना लगावला.
तसेच पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजकारणाचा स्तर अत्यंत खालावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची घेतलेली भेट ही परंपरा भंग करणारी आहे. खरे तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना आपल्या दालनात बोलावू शकतात आणि तेथेही राजकीय चर्चा करू शकतात. वर्षा बंगल्यावर नेमकी काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहिती किंवा संभाव्य निकालाची माहिती नार्वेकरांनी शिंदे यांना दिली असावी, असे सूचक वक्तव्य करत संपूर्ण निकाल प्रक्रियेला संशयाच्या भोवऱ्यात आणून ठेवले.