काल शुक्रवारी कोल्हापूरातील दसरा मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा झाली. त्यावेळी पक्षाला सोडून अजित पवार गटाच्या आमदारांवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ज्यांना चौकशीला बोलविण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत जा नाही तर तुमची जागा इतरत्र आहे. भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, तुमच्यावर धाडी पडणार त्यात पक्षाने काय करायला पाहिजे. विशेष म्हणजे जे तुरूंगात गेले नाहीत ते असे बोलत आहेत असा उपरोधिक टोला मुश्रीफ यांना लगावला.
कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्या पक्षातील सहकारी अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही चौकशीसाठी बोलविण्यात आलं. सत्तेत गेलेल्यांबरोबर येण्याचं सांगण्यात आलं. पण ते तुरुंगात गेले. आमचे मित्र संजय राऊत यांनाही चौकशीला बोलविण्यात आलं. पण ते ही तुरुंगात गेले. पण सत्ताधाऱ्यांबरोबर गेले नाहीत असे स्पष्ट केले.
याचबरोबर शरद पवार म्हणाले, जे तुरुंगात गेले होते त्यांच्यासाठी पक्षाने काहीही केले नाही. त्यामुळे कोणालाच काही मदत केली नाही. तर यांच्यासाठी पक्षाने का मदत करावी. बरं जे गेले तुरुंगात ते बोलत नाहीत. जे गेले नाहीत ते असं बोलत आहेत असा फरकही सांगितला.
यावेळी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता शरद पवार यांनी उपरोधिकपणे कोण बच्चू कडू असा सवाल केला. त्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी ते कोणत्याही मोठ्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय चार वेळा आमदार झाल्याचे स्पष्ट करताच शरद पवार म्हणाले, पण मी चार वेळा मुख्यमंत्री झाल्याचे सांगत मी केंद्रात जबाबदार खात्याचा मंत्रीही झालो आहे असे मिश्कील उत्तर दिले.
तसेच यावेळी शरद पवार यांनी पक्षातील फुटीसंदर्भात बोलताना म्हणाले, ८-९ आमदार गेले म्हणजे पक्ष फुटला असे म्हणता येत नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे गेले तेच सांगतायत असे सांगत पक्ष फुटणे म्हणजे संघटनेतील बहुतांष संघटनेतील लोक राज्यातील आणि देशातील जाणे म्हणजे पक्ष फुटणे असा होतो असे सांगत पक्षात फुट पडली नसल्याचे सांगितले.